गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?

इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय?

सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारींकडे पोलिस स्थानके दुर्लक्ष करतात. एखादे प्रकरण गुन्हा शाखेकडे द्यायचे असेल, तर मोठा आटापीटा, आंदोलने करून सरकारला भाग पाडावे लागते. पण येथे मात्र स्थानिक पोलिस स्थानकाला अजिबात वास लागू न देता, थेट गुन्हा शाखेकडेच तक्रार दाखल केली जाते, आणि गुन्हा शाखेकडून कारवाई करून पीडिताची चोरीला गेलेली रक्कमही वसूल करून दिली जाते. पहिल्या प्रथम या धाडसी कारवाईसाठी गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन. इतरही सामान्य नागरिकांच्या तक्रारींप्रती गुन्हा शाखेकडून हीच तत्परता दाखवली जाईल,अशी अपेक्षा करता येईल.
हा अजब प्रकार बार्देश तालुक्यात घडला. या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतीय संविधान जरी सर्वांना समानता बहाल करत असले, तरी सरकार आणि प्रशासनाच्या दारी काही लोकांना विशेष आणि अतिमहनीय असा मान प्राप्त आहे. आता इतरांच्या मानसन्मानामुळे आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.
दोनापावला येथील धेंपो कुटुंबाच्या बंगल्यातील दरोड्याचा तपास सुरू आहे की बंद करण्यात आला, याची खात्री नाही. पण बार्देशातील एका प्रभावी राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबात चोरी प्रकरणामुळे पोलिसांची बरीच धावपळ झाली. गुन्हा शाखेने तात्काळ कारवाई केली आणि चोरीला गेलेले १६ लाखांचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला जातो. घरातील नेपाळी मोलकरणीनेच चोरी केली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने नेपाळला जाऊन या प्रकरणाचा तपास लावला. या मोलकरणीला पोलिस पथक गोव्यात घेऊन येणार आहे.
हा राजकीय नेत्याचा कर्मचारी जुने गोवे परिसरात राहतो. चोरी झाल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली. थेट गुन्हा शाखेकडे तक्रार करण्याचा विचार या कर्मचाऱ्याच्या पत्नीला सहजपणे आला हे देखील एक नवलच ठरावे. जुने गोवे पोलिस स्थानकात या चोरीची काहीच नोंद नाही. घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात मोलकरीण तीन मोठ्या बॅगा घेऊन पसार होत असल्याचे फुटेज मिळाल्याची माहिती आहे. १६ लाखांचे दागिने आणि कागदपत्रांसाठी तीन बॅगांची गरज लागण्याची शक्यताच नाही. मग मोलकरणीने या बॅगांत भरून नेले तरी काय? या प्रश्नाचे उत्तर अजून सापडू शकले नाही.
पीडितांकडून दिलेल्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या मालाचा शोध लागल्यामुळे, उर्वरित बॅगांत काय होते याचा शोध घेण्याची तसदी गुन्हा शाखेने घेतली नसेल, असे म्हणता येईल. या एकूणच प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या चोरीची माहिती स्थानिक पोलिस स्थानकाला का देण्यात आली नाही? चोरीची तक्रार थेट गुन्हा शाखेत केल्यानंतर, तिथे तात्काळ कारवाई का करण्यात आली? ही स्पेशल ट्रीटमेंट सामान्य नागरिकांनाही उपलब्ध आहे की केवळ ठरावीक लोकांसाठीच आहे? इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय? नेपाळला गेलेल्या पोलिसांना त्या इतर बॅगांमध्ये नेमके काय चोरून नेले होते, हे माहीत असेल का? की माहीत असूनही त्या बॅगांमध्ये काय होते हे सांगण्याची पोलिसांना गरज वाटली नाही ? या सगळ्या प्रकरणात नेमके सत्य काय? हे फक्त पोलिसच सांगू शकतील.

  • Related Posts

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    एकीकडे देशातील अव्वल दरडोई उत्पन्नाचे राज्य अशी शेखी मिरवायची आणि दुसरीकडे या सामाजिक योजनांतून गोंयकारांच्या मानसिक दारिद्र्याचे प्रदर्शन भरवायचे, असा हा खेळ गेली काही वर्षे सुरू आहे. समाज कल्याण खात्याचे…

    हे नेमकं चाललंय काय?

    समाज अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालला आहे. “मला काय त्याचे?”, “मला काय मिळणार?” अशी मानसिकता बळावत चालली आहे आणि त्यामुळे समूह, ग्रामसंस्था यांसारख्या संकल्पनाच कमकुवत होत आहेत. आज सकाळी धारगळ–पेडणे येथे…

    One thought on “गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?

    1. काय एक गुंतागुंतीचा प्रकार आहे हा! बॅगांमध्ये काय होते, हे कसे नक्की केले जाऊ शकत नाही? पोलिसांनी तपास का केला नाही, हे आणखी एक प्रश्न आहे. गोविंद गावडे यांचा अभिमन्यूचा भूमिका म्हणजे काय, हे समजून घेणे गरजेचे आहे. राजकीय चक्रव्युह भेदण्याची त्यांची क्षमता किती आहे? अनुसूचित जमातींच्या हक्कांसाठी चाललेला हा संघर्ष किती महत्त्वाचा आहे? हे सर्व प्रश्न उत्तरे शोधत आहेत, पण तुमच्या मते, गोविंद गावडे यांचा हा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता किती आहे?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!