कुणीही यावे टोपी घालून जावे

भ्रष्टाचार न करणाऱ्यांना आत्ताचा समाज मुर्खाच्या यादीत टाकतो आणि अप्रमाणिकपणे पैसे जमवून ते मिरवणाऱ्याला आपला आदर्श मानतो. ही मानसिकता नेमकी आपल्याला कुठे नेऊ पाहत आहे?

राज्यात विविध फसवणूकीची प्रकरणे पाहील्यानंतर लहानपणी कुणीही यावे आणि टीचकी मारून जावे, या खेळाची आठवण येते. एरवी आम्ही गोंयकार हुशार असे म्हणून मिरवतो पण या हुशार गोंयकारांना जो तो सहजपणे टोपी घालतो हे पाहील्यानंतर आमच्या हुशारपणावरच संशय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित या फसवणूकीला आमच्या हुशारीवर बोट ठेवण्यापेक्षा समोरील माणसावर अतिविश्वास ठेवण्याचा गुणही जबाबदार ठरतो की काय, हे देखील आम्हाला पाहावे लागणार आहे. पूर्वीच्या काळी हे चालत होते कारण त्यावेळी प्रामाणिकपणा शिल्लक होता. आता तो गायब झाला आहे, असे म्हणता येणार नाही पण नक्कीच लयाला गेला आहे हे मात्र नक्की. गोंयकार मोठ्या संख्येने परदेशात असल्याकारणाने त्यांच्याकडून आपल्या कुटुंबाला आणि विशेष करून आपल्या पालकांना पैसे पाठविण्याची पद्धत अजूनही सुरू आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस जरा मुंबईतल्या मनी ऑर्डरकडे टक लावून बसतो तसाच गोंयकार विदेशातून कधी पैसे खात्यात जमा होतात, याची वाट पाहत असतो. आता तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे या गोष्टी सोप्या बनल्या आहेत. मग हे पैसे राखून ठेवायचे. कुणीतरी जादा व्याज देतो,असे सांगितले की त्याला बळी पडायचे. गोंयकारांच्या या आर्थिक गुपीताची माहिती असलेल्यांनी मग अशा लोकांना आपल्या मोहपाशात अडकवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला वाढीव व्याज देऊन त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि उरलेली रक्कमही जमा करून घ्यायची आणि पसार व्हायचे,असे प्रकार कायम घडत राहीलेले आहेत. ही जागा नंतर सहकारी पतसंस्थांनी घेतली. आपलेच गोंयकार आपल्याच लोकांना या पतसंस्थेत ठेवी ठेवण्यासाठी आर्जव करायचे आणि मग त्यातून दिलेली कर्जे बुडल्यानंतर या ठेवींवर गंडांतर यायचे. अशा पतसंस्था, सहकारी संस्थांकडूनही कोट्यवधी रूपयांचा गंडा गोंयकारांना घातला आहे. गोंयकारांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे फक्त तो कसा बाहेर काढायचा यासासी शक्कल लागते,असा समजच असले उद्योग करणाऱ्या लोकांनी करून ठेवला आहे. सध्याची प्रकरणे पाहील्यानंतर तो समज चुकीचा आहे,असे अजिबात म्हणता येणार नाही. नोकरीसाठी बिनधास्त लाखो रूपयांची लाच देणे, जादा व्याजासाठी खाजगी गुंतवणूक कंपन्यांत पैसे गुंतवायचे, मोबाईलवरील संदेश किंवा अन्य गोष्टींत फसून पैसे पाठवायचे, सायबर आमिषांना बळी पडायचे आदी अनेक प्रकार घडत आहेत. या सर्व आर्थिक गुन्हेगारी प्रकरणात मोठी शिक्षा होत नाही आणि सहजपणे सुटता येते,असेही कदाचित अनेकांना वाटत असेल म्हणून झटपट पैसे कमविण्याचा हा नवा धंदा सुरू झाला आहे. सुशेगाद आणि वोर्राद गोंयकार ही आपली ओळख. अलिकडे या वोर्रादपणात आपला गोंयकार इतका फसला आहे की पैशांसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी त्याची बनत चालली आहे. इतका स्वार्थी आणि लालची गोंयकार कधीच नव्हता. ही मानसिकता राजकीय दूषीत संस्कारांमुळे घडली आहे आणि त्याचे परिणाम सामाजिक परिस्थितीवरही पडले आहेत. भ्रष्टाचार न करणाऱ्यांना आत्ताचा समाज मुर्खाच्या यादीत टाकतो आणि अप्रमाणिकपणे पैसे जमवून ते मिरवणाऱ्याला आपला आदर्श मानतो. ही मानसिकता नेमकी आपल्याला कुठे नेऊ पाहत आहे?

  • Related Posts

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    एकीकडे देशातील अव्वल दरडोई उत्पन्नाचे राज्य अशी शेखी मिरवायची आणि दुसरीकडे या सामाजिक योजनांतून गोंयकारांच्या मानसिक दारिद्र्याचे प्रदर्शन भरवायचे, असा हा खेळ गेली काही वर्षे सुरू आहे. समाज कल्याण खात्याचे…

    हे नेमकं चाललंय काय?

    समाज अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालला आहे. “मला काय त्याचे?”, “मला काय मिळणार?” अशी मानसिकता बळावत चालली आहे आणि त्यामुळे समूह, ग्रामसंस्था यांसारख्या संकल्पनाच कमकुवत होत आहेत. आज सकाळी धारगळ–पेडणे येथे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!