गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?

इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय?

सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारींकडे पोलिस स्थानके दुर्लक्ष करतात. एखादे प्रकरण गुन्हा शाखेकडे द्यायचे असेल, तर मोठा आटापीटा, आंदोलने करून सरकारला भाग पाडावे लागते. पण येथे मात्र स्थानिक पोलिस स्थानकाला अजिबात वास लागू न देता, थेट गुन्हा शाखेकडेच तक्रार दाखल केली जाते, आणि गुन्हा शाखेकडून कारवाई करून पीडिताची चोरीला गेलेली रक्कमही वसूल करून दिली जाते. पहिल्या प्रथम या धाडसी कारवाईसाठी गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन. इतरही सामान्य नागरिकांच्या तक्रारींप्रती गुन्हा शाखेकडून हीच तत्परता दाखवली जाईल,अशी अपेक्षा करता येईल.
हा अजब प्रकार बार्देश तालुक्यात घडला. या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतीय संविधान जरी सर्वांना समानता बहाल करत असले, तरी सरकार आणि प्रशासनाच्या दारी काही लोकांना विशेष आणि अतिमहनीय असा मान प्राप्त आहे. आता इतरांच्या मानसन्मानामुळे आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.
दोनापावला येथील धेंपो कुटुंबाच्या बंगल्यातील दरोड्याचा तपास सुरू आहे की बंद करण्यात आला, याची खात्री नाही. पण बार्देशातील एका प्रभावी राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबात चोरी प्रकरणामुळे पोलिसांची बरीच धावपळ झाली. गुन्हा शाखेने तात्काळ कारवाई केली आणि चोरीला गेलेले १६ लाखांचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला जातो. घरातील नेपाळी मोलकरणीनेच चोरी केली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने नेपाळला जाऊन या प्रकरणाचा तपास लावला. या मोलकरणीला पोलिस पथक गोव्यात घेऊन येणार आहे.
हा राजकीय नेत्याचा कर्मचारी जुने गोवे परिसरात राहतो. चोरी झाल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली. थेट गुन्हा शाखेकडे तक्रार करण्याचा विचार या कर्मचाऱ्याच्या पत्नीला सहजपणे आला हे देखील एक नवलच ठरावे. जुने गोवे पोलिस स्थानकात या चोरीची काहीच नोंद नाही. घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात मोलकरीण तीन मोठ्या बॅगा घेऊन पसार होत असल्याचे फुटेज मिळाल्याची माहिती आहे. १६ लाखांचे दागिने आणि कागदपत्रांसाठी तीन बॅगांची गरज लागण्याची शक्यताच नाही. मग मोलकरणीने या बॅगांत भरून नेले तरी काय? या प्रश्नाचे उत्तर अजून सापडू शकले नाही.
पीडितांकडून दिलेल्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या मालाचा शोध लागल्यामुळे, उर्वरित बॅगांत काय होते याचा शोध घेण्याची तसदी गुन्हा शाखेने घेतली नसेल, असे म्हणता येईल. या एकूणच प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या चोरीची माहिती स्थानिक पोलिस स्थानकाला का देण्यात आली नाही? चोरीची तक्रार थेट गुन्हा शाखेत केल्यानंतर, तिथे तात्काळ कारवाई का करण्यात आली? ही स्पेशल ट्रीटमेंट सामान्य नागरिकांनाही उपलब्ध आहे की केवळ ठरावीक लोकांसाठीच आहे? इतक्या सगळ्या बॅगांमध्ये नेमके काय होते? त्या बॅगांतील सामानाचा तपास पोलिसांनी का घेतला नाही? तक्रारदाराने त्या सामानाबद्दल चौकशी केली नाही म्हणून पोलिसांनीही दुर्लक्ष केले काय? नेपाळला गेलेल्या पोलिसांना त्या इतर बॅगांमध्ये नेमके काय चोरून नेले होते, हे माहीत असेल का? की माहीत असूनही त्या बॅगांमध्ये काय होते हे सांगण्याची पोलिसांना गरज वाटली नाही ? या सगळ्या प्रकरणात नेमके सत्य काय? हे फक्त पोलिसच सांगू शकतील.

  • Related Posts

    डेल्टीनचा पुळका नेमका कुणाला?

    प्रतिनिधी निवडून सरकारात पाठवले जातात की कॅसिनो सम्राट किंवा रिअल इस्टेट कंपन्यांचे हस्तक, असा संशय घेण्यास वाव आहे. सरकारच्या विविध निर्णयांमुळे हा संशय अधिक गडद होतो. पेडणे तालुक्यातील धारगळ गावामध्ये…

    प्रशासन बनले ‘सैराट’…

    मंत्र्यांची मर्जी राखणे आणि त्या बदल्यात लाभ घेणे ही प्रथा प्रशासनात रुजत आहे आणि ती अत्यंत धोकादायक ठरत आहे. काही अधिकारी इतके मुजोर झाले आहेत की त्यांना काहीच भीती राहिलेली…

    One thought on “गुन्हा शाखेचे त्रिवार अभिनंदन ?

    1. काय एक गुंतागुंतीचा प्रकार आहे हा! बॅगांमध्ये काय होते, हे कसे नक्की केले जाऊ शकत नाही? पोलिसांनी तपास का केला नाही, हे आणखी एक प्रश्न आहे. गोविंद गावडे यांचा अभिमन्यूचा भूमिका म्हणजे काय, हे समजून घेणे गरजेचे आहे. राजकीय चक्रव्युह भेदण्याची त्यांची क्षमता किती आहे? अनुसूचित जमातींच्या हक्कांसाठी चाललेला हा संघर्ष किती महत्त्वाचा आहे? हे सर्व प्रश्न उत्तरे शोधत आहेत, पण तुमच्या मते, गोविंद गावडे यांचा हा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता किती आहे?

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    30/07/2025 e-paper

    30/07/2025 e-paper

    डेल्टीनचा पुळका नेमका कुणाला?

    डेल्टीनचा पुळका नेमका कुणाला?

    सरकारची सरपंचांना थेट धमकी ?

    सरकारची सरपंचांना थेट धमकी ?

    29/07/2025 e-paper

    29/07/2025 e-paper

    प्रशासन बनले ‘सैराट’…

    प्रशासन बनले ‘सैराट’…

    अबब ! ५३ लाख रुपये कुणाच्या खात्यात ?

    • By Gaonkaari
    • जुलै 29, 2025
    • 10 views
    अबब ! ५३ लाख रुपये कुणाच्या खात्यात ?
    error: Content is protected !!