पणजी, दि. २१: येत्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या केवळ तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशन बुधवारी संपणार असल्याने खासगी सदस्यांच्या कामकाजासाठी (Private Members’ Business) शुक्रवार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे अधिवेशनातील एक दिवस खासगी सदस्यांच्या कामकाजासाठी राखून ठेवावा, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
शुक्रवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत आपण हा मुद्दा उपस्थित केल्याचे आलेमाव यांनी सांगितले. राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधकांना चर्चा करायची असून त्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“परंपरेनुसार खासगी सदस्यांचे कामकाज शुक्रवारी घेतले जाते. मात्र हे अधिवेशन बुधवारीच संपणार असल्याने खासगी सदस्यांचे ठराव सादर करण्याची संधी मिळणार नाही. मागील अधिवेशनात आम्ही २८ खासगी सदस्य ठराव सादर केले होते; परंतु सरकारने त्यावर चर्चा होऊ दिली नाही. त्यामुळे या अधिवेशनात एक दिवस त्यासाठी राखून ठेवावा,” अशी मागणी आलेमाव यांनी केली.
भाजपकडे बहुमत असल्याने विधानसभेतही ‘दादागिरी’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थसंकल्पावर चर्चा न करता तसेच लेखानुदानावरील मतदानाशिवाय तो मंजूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
राज्याची वहनक्षमता (कॅरिंग कॅपॅसिटी), खड्डेमय आणि खराब रस्ते, कारागृहांपर्यंत पोहोचणारे अमली पदार्थ तसेच कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्याची विरोधकांची इच्छा असल्याचे आलेमाव म्हणाले. “हे सर्व प्रश्न केवळ तीन दिवसांच्या अधिवेशनात मांडणे शक्य आहे का?” असा सवाल करत त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
“गोवा विक्रीला काढला आहे. हे थांबले पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करणे हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे,” असे आलेमाव यांनी ठणकावले.
भाजप सरकारची ही कार्यपद्धती गोव्याची जनता पाहत असून राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि गोव्याचा होत असलेला विनाश यासाठी जनता योग्य वेळी सरकारला उत्तर देईल, असा दावा आलेमाव यांनी केला.





