भाजप नेते महानंद अस्नोडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)
“आम्ही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देशप्रेमी आहोत, आणि तुम्ही देशद्रोही आहात,” असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकावणाऱ्या भाजप नेते तथा उत्तर गोवा भाजप जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर यांच्याविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री आपल्या मोबाईलवरून अस्नोडकर यांनी शेर्लेकर यांना धमकावल्यावर, शेर्लेकर यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शनिवारी सकाळी अस्नोडकर यांना पोलिस स्थानकात पाचारण केले. शेर्लेकर यांनी जारी केलेल्या व्हिडिओत भाजप कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे, कार्यकर्त्यांविषयी अपमानास्पद शब्द वापरले आहेत, म्हणून त्यांना समजावण्यासाठी आपण फोन केला, असे अस्नोडकर यांनी सांगितले.
शेर्लेकर यांनी मात्र, “राज्याच्या हिताआड सरकारचे निर्णय जात असल्यास त्यांना विरोध करणे हे नागरिक म्हणून आमचे कर्तव्य आहे,” अशी भूमिका मांडली. “या चुकीच्या निर्णयांची जबाबदारी सरकार व सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, किंवा सरकारला ती चूक सुधारण्यास भाग पाडावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दोघांनीही एकमेकांची माफी मागण्यास नकार दिल्यानंतर अखेर पोलिसांनी हे प्रकरण कलम ३५२ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवले.
सर्व थरांतून निषेध
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्याशी संबंधित प्रकरण ताजे असतानाच, स्वप्नेश शेर्लेकर यांना धमकावण्याचे प्रकरण पुढे आल्याने सर्व स्तरांतून या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “रामा काणकोणकर प्रकरणी मास्टरमाईंडला सरकारकडून अभय मिळत आहे, त्यामुळेच आता कुणालाही धमकावण्याचे बळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळत आहे,” अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
“गोव्याचे पर्यावरण जपण्यासाठी लढणारे कार्यकर्ते भाजपला शत्रू वाटत असल्यामुळेच हे प्रकार घडत आहेत,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. “सरकार आणि बिल्डर लॉबी यांच्यात साटेलोटे आहे. अशावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, तर त्यांचा काटा काढण्याची भाषा भाजपकडून केली जाते,” असा आरोप आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केला. आम आदमी पार्टीने तर “भाजपचे गुंडाराज गोव्यात नको” या नावाने मोहीमच सुरू केली आहे. या एकूणच घटनेबाबत भाजपमध्ये मात्र शांतता पसरली आहे.
मोबाईलवरील संभाषण व्हायरल
महानंद अस्नोडकर आणि स्वप्नेश शेर्लेकर यांच्यातील मोबाईल संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संवादात, “भाजपच्या एखाद्या नेत्याच्या चुकीमुळे सर्वांनाच दोष देणे अयोग्य आहे,” असे अस्नोडकर म्हणाले आहेत. “पर्वरी खाप्रेश्वराची पुनर्स्थापना आमच्यामुळे झाली आहे. श्री देव खाप्रेश्वराच्या वाटेला गेलेल्यांचा नायनाट होईल,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“आम्ही भाजपवाले देशप्रेमी आहोत, देश प्रथम हे तत्त्व मानणारे आहोत. त्यामुळे आम्हाला कुणी काहीही म्हटले, तरी ते सहन केले जाणार नाही,” असेही अस्नोडकर यांनी स्पष्ट केले. शेर्लेकर यांच्या कार्याची दखल घेत, “हे सोडून इतर विषयांवर आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असेही त्यांनी संवादात नमूद केले आहे.






