
अग्निशमन जवानांना रोखले, रस्त्याअभावी बंब वाटेवर
वास्को, दि. २४ (प्रतिनिधी)
सावरफोंड- सांकवाळ येथे भूतानी प्रकल्पाच्या नियोजित पठारावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. येथील झाडांना आग लावण्याचे प्रकार घडल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याठिकाणी आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना पठारावर जाण्यास तेथील सुरक्षा रक्षकांनी रोखले. राज्यात कायदा ही चीज आहे की नाही, असा खडा सवाल माजी पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांनी केला.
सावरफोंड- सांकवाळ येथील नियोजित भूतानी प्रकल्पावरून गेले अनेक महिने आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. बेकायदा बोअरवेल खोदण्याचे काम सुरू आहे. आज झाडांची कत्तल करण्यासाठी याठिकाणी १० ते १५ कामगारांना पाठविण्यात आले. यानंतर याठिकाणी झाडांना आग लावण्यात आली. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असता तिथे येण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना बंब रस्त्यावरच ठेवून आत यावे लागले. आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी ते जात असता कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रकार घडला. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली तरीही पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाही. सगळी सरकारी यंत्रणा या बिल्डराच्या पाठीमागे त्याला संरक्षण देण्यासाठी वावरत आहे आणि स्थानिकांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी केली.
कुठे आहेत आमदार?
कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी सांकवाळवासीयांना पाठिंबा दिला आहे. ते या सरकारचे घटक असल्याने या विषयी स्थानिकांना न्याय देण्याचे सोडून ते लपवालपवी करत असल्याची टीका करण्यात आली. भूतानी कंपनीला स्थानिक पंचायतीने बांधकाम परवाना बेकायदेशीर रित्या दिला. बांधकामासाठी आवश्यक परवाने नसताना याठिकाणी काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांच्या कुरापती सुरू असल्यामुळे सरकारच्या पाठींब्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे प्रेमानंद नाईक म्हणाले.
अराजकतेचा कहर
राज्यात सध्या अराजकतेचा कहर सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेला कुणीही वाली राहिलेला नाही. गोंयकार निराधार बनले आहेत. सगळी सरकारी यंत्रणाच बिल्डरांच्या मागे उभी आहे आणि लोकांवर अन्याय केला जातो आहे, अशी टीका माजीमंत्री एलिना साल्ढाणा यांनी केली. ही जागा खाजगी वनक्षेत्रात येते. तरीही या जागेत वृक्षतोडीला परवानगी कशी काय देण्यात आली. झाडांना आग लावण्याचा निंदनीय प्रकार घडत असताना सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपणाचे सोंग घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
qq3tq4