पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर या घोटाळ्याची मुळे उखडण्यापेक्षा त्यांचा कल ही मुळे लपवून ठेवण्याकडेच अधिक दिसतो.
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेण्यासंबंधीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकार चक्रव्युहात अडकले आहे. गेले वर्षभर हे प्रकरण शीतपेटीत बंद पडलेले असताना, अचानकपणे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने सनसनाटी गौप्यस्फोट करून सर्वांचीच झोड उडवली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका मंत्र्याचे नाव तिने घेतले, हे खरे. परंतु त्या मंत्र्याने केवळ आपली ओळख या दोन अधिकाऱ्यांकडे करून दिली, एवढाच त्यांचा सहभाग आहे. त्या मंत्र्याकडे आपण पैसे दिल्याचे तिने म्हटलेले नाही.
या मंत्र्याचे नाव जरी उघड झाले नसले, तरी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून संबंध ताणलेले केतन भाटीकर यांनी केलेले वक्तव्य — “सुदिन ढवळीकर हे नोकऱ्यांसाठी पैसे घेणाऱ्यांपैकी नाहीत” यावरून अप्रत्यक्षपणे पूजा नाईक हिने गौप्यस्फोट केलेले मंत्री हे ढवळीकरच आहेत, असे सूचित होते.
वास्तविक, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे केला असता, तर पूजा नाईक हिला अशा प्रकारे बिनधास्त बोलण्याचे धाडसच झाले नसते. तिने सांगितले की, आपण सुमारे १७ कोटी रुपये परत केले असून हे पैसे आपल्याला त्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळायचे आहेत. ते पैसे मिळाले नाहीत, तर आपण त्यांची नावे उघड करणार, असेही ती म्हणाली. यापूर्वीच तीने ही नावे पोलिसांना दिल्याचे वक्तव्य केले आहे, मग नव्याने ती नावे उघड करण्यात नाविन्य काय राहिले?
ती जेव्हा म्हणते की आपण १७ कोटी रुपये उमेदवारांना परत केले, तेव्हा त्यावर किती विश्वास ठेवावा, हा देखील गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता, पूजा नाईक हिला हा गौप्यस्फोट करण्यासाठी कुणीतरी फुस दिली नाही का, असा संशय येणे स्वाभाविकच आहे.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा नाईक हिने आपल्या गौप्यस्फोटात मीडियाशी बोलताना ही नावे उघड केली होती. सहाजिकच मीडियाला ही नावे माहित आहेत. तरीही कायदेशीर बंधनांमुळे ती उघड करणे अयोग्य आणि चुकीचे ठरते. जेव्हा पत्रकारांनी सुदिन ढवळीकर यांना या आरोपांबाबत विचारले, तेव्हा त्यांनी म्हटले की, पूजा नाईक ही आपली कात वाचवण्यासाठी कुणाचीही नावे घेऊ शकते. यासोबतच शिक्षण खात्याशी संबंधित एका शिक्षकाच्या भरतीविषयाचा उल्लेख त्यांनी केला. त्या भरतीविषयी पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असेही ढवळीकर म्हणाले.
ढवळीकरांचे हे वक्तव्य साधेपणाने पाहता येणार नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष्य करू पाहत आहे आणि त्यामुळे आपल्या वाटेला आल्यास आपल्याकडेही प्रतिकारासाठीची शस्त्रे आहेत, असा काहीसा संदेश त्यांनी या वक्तव्यातून दिला असावा.
खरे तर हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा आकडा केवळ १७ कोटींचा नसून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्यांचे पैसे गेले आहेत, ते बोलू शकत नाहीत, कारण त्यांनीही लाच देण्याचा गुन्हा केला आहे. या पैशांमुळे उमेदवारांची काय परिस्थिती झाली आहे, याचे कुणालाही सोयरसुतक नाही. ही साखळी खूप लांब असण्याची शक्यता आहे.
पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर या घोटाळ्याची मुळे उखडण्यापेक्षा त्यांचा कल ही मुळे लपवून ठेवण्याकडेच अधिक दिसतो. शेवटी हा धुरळाही शांत होईल की या प्रकरणाचा काहीतरी शेवट लागेल, हे पाहण्यासाठी थोडी कळ सोसावी लागेल.






