आंदोलकांनी फलक फडकावले, विधानसभेत गदारोळ
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
सावर्डे मतदारसंघातील मिराबाग येथे मागील २५ दिवसांपासून सुरू असलेल्या बंधारा विरोधातील आंदोलनाचा भडका अखेर गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उडाला. आमदार विजय सरदेसाई यांनी या विषयावर विशेष चर्चेचा प्रस्ताव मांडताच प्रेक्षकगृहात बसलेल्या आंदोलकांनी फलक फडकावत सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सभागृहात गदारोळ झाला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलकांना अटक करण्याची मागणी करत विशेषाधिकारभंग प्रस्ताव सादर केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती सभापती डॉ. गणेश गांवकर यांच्याकडे केली.
मिराबाग आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. आंदोलनाच्या २५व्या दिवशी मिराबागवासीय मडगाव लोहीया मैदानावर धडकले. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा विषय चर्चेला येणार अशी शक्यता होतीच. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विशेष चर्चेचा प्रस्ताव मांडला असतानाच आंदोलक फलक घेऊन प्रेक्षकगृहात उभे राहिल्याने गोंधळ उडाला. आंदोलकांना सभागृहातील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले.
सभापती डॉ. गणेश गांवकर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावताना, मिराबाग विषयावर अनेक आमदारांनी प्रश्न विचारले असल्याने वेगळ्या विशेष चर्चेची गरज नाही असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेची निंदा करत, “विरोधक सत्तेसाठी आसुसलेले आहेत; हा विषय आंतकवादाला प्रोत्साहन देण्यासारखा आहे,” असे वक्तव्य केले.
पाण्यासाठीची तरतूद
मिराबाग बंधारा प्रकल्प हा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आहे. आंदोलक उपस्थित करत असलेले मुद्दे निराधार आहेत. “गांव बुडणार” हा गैरसमज पसरवला जात आहे, असे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
निवडणूक राजकारणाचा आरोप
सभापती डॉ. गणेश गांवकर यांनी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगून, निवडणुका जवळ आल्यामुळेच राजकीय हेतूने आंदोलन केले जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.
विरोधकांची मागणी
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आंदोलकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा विषय तातडीने निकालात काढावा, असे आवाहन केले.
आंदोलक लोहीया मैदानावर
मिराबाग आंदोलकांनी आज मडगाव लोहीया मैदानावर धडक दिली. अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला. “सरकारतर्फे एकही जबाबदार नेता किंवा अधिकारी आंदोलकांची समजूत काढू शकला नाही, यावरून बंधारा प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” अशी टीका आंदोलकांनी केली.





