मोरजीत खूनी हल्ला, गुन्हा नाही

पोलिस महासंचालकांकडून दखल, कारवाईची प्रतिक्षा

पणजी,दि.९(प्रतिनिधी)

पेडणे तालुक्तातील मोरजी येथे कथित पठारावर २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता खूनी हल्ला झाल्याची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर आजतागायत एफआयआर नोंद झालेली नाही. पोलिस महासंचालकांकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली असली तरी बरेच तास उलटल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
जमीनीच्या व्यवहारांवरून घमासान
मांद्रेचे माजी सरपंच तथा पंच महेश कोनाडकर यांच्यावरील खूनी हल्ल्याचा विषय ताजा असतानाच त्याच दरम्यान मोरजी येथेही अशीच घटना घडली. एम.व्ही.देशपांडे यांनी यासंबंधीची तक्रार मांद्रे पोलिस स्थानकात केली आहे. या तक्रारीत त्यांनी प्रितम रेड्डी, ओमकार फाटक, श्री. सुरेश आणि अन्य ४० ते ५० अज्ञात लोकांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. खूनाचा प्रयत्न तथा जीवाला धोका निर्माण केल्याचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. कोनाडकरांच्या हल्ला जमीन व्यवहारांवरून झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले असताना हा हल्ला देखील जमीनीशी संबंधीत असल्याचे तक्रारीतील विषयांवरून समजते. विशेष म्हणजे ही तक्रार मांद्रे पोलिस स्थानकांत दाखल करून आठवडा उलटला तरीही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. प्रितम रेड्डी यांचे सरकारातील एका बड्या मंत्र्यांशी निकटचे संबंध असल्यामुळेच तक्रार दाखल करून घेण्यात हयगय होत असल्याचा संशय तक्रारदाराने केला आहे. या मंत्र्यांच्या जोरावर इथे लोकांना संपवण्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू असल्याचेही तक्रारदार देशपांडे यांनी म्हटले आहे.
राजेश फडते याच्यावर हल्ला
मोरजी येथील रेड्डी यांच्या जवळच तक्रारदाराची जमीन आहे. या जमीनीत जाण्यासाठी अडवणूक केली जाते. तक्रारदार हे आपले मित्र राजेश फडते यांच्यासोबत जात असता त्यांना अडवून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर मांद्रे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यास गेले असता तेथील हवालदाराने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. राजेश फडते याला म्हापसा जिल्हा इस्पितळ आणि जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. जीवाच्या भितीने त्याने इस्पितळात दाखल होण्यास नकार दिला कारण हल्लेखोरांनी इस्पितळात येऊन संपवू,अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मांद्रेचे निरीक्षक, उत्तर गोवा निरीक्षक तथा उपअधिक्षकांना देऊनही गुन्हा नोंद झालेला नाही,अशी नाराजी देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
महासंचालकांची दखल
पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी या तक्रारीची माहिती मिळताच याची दखल घेतली. आपण या तक्रारीची शहनिशा करू,असे सांगून त्यांनी ही तक्रार मागवून घेतली खरी परंतु त्यांच्यापर्यंत तक्रार पोहचून आता कितीतरी तास उलटले तरी त्यांच्याकडूनही अद्याप गुन्हा नोंद करण्याचे आदेश जारी झाले नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. तक्रारीत नमुद केलेल्या लोकांचे घनिष्ट राजकीय हीतसंबंध असल्यामुळे पोलिसांकडून उघडपणे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत,अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Related Posts

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    नास्नोळाचे पंच सतीश गोवेकर यांची मागणी गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २००२ साली कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करून ३५२(ए) कलम आणले होते.…

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    बेकायदा बांधकामांवर खंडपीठाचे कठोर निर्देश गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील बेकायदा बांधकामांबाबत स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या दखल याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार कारवाई अहवाल सादर करण्यात बहुतांश नगरपालिका आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!