खासदार विरियातो फर्नांडिस यांचे पत्र
गांवकारी,दि.३(प्रतिनिधी)
दाबोळी मतदारसंघातील चिखली पंचायत क्षेत्रात प्रभू व्हायोलेटा या रहिवासी संकुलात बिल्डरच्या बेजबाबदारपणामुळे पाणी दूषीत होऊन सुमारे दोनशे लोकांना अतिसाराचा त्रास जाणवल्याचा विषय दिल्लीत पोहचला आहे. खासदार विरियातो फर्नांडिस यांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून बिल्डर आणि संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
दिल्लीतील नेते,अधिकाऱ्यांना फोनाफोनी
प्रभू व्हायोलेटा रहिवासी संकुलात सुमारे साडेतीनशे फ्लॅटधारक आहेत. यापैकी ९० टक्के परप्रांतीय लोक असून त्यात नौदल, नौसेना तथा केंद्र सरकारच्या विविध संस्थांचे निवृत्त अधिकारी आहेत. या संकुलातील पाणी दूषीत प्रकरण, अतिसाराची साथ आणि डायफॉइडची प्रकरणे आढळून आल्यानंतरही राज्य प्रशासनाकडून आरोग्य खाते वगळता इतरांचा काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने लोक संतप्त झाले. या लोकांनी दिल्लीतील आपले ओळखीचे नेते, अधिकारी मंडळी यांना या परिस्थितीची जाणीव दिल्यानंतर हा विषय खासदार विरियातो फर्नांडिस यांच्याकडे पोहचला. तत्पूर्वीच खासदार विरियातो फर्नांडिस यांनी प्रभू व्हायोलेटो रहिवासी संकुलातील लोकांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन दिले होते. आरोग्य सचिवांनी बोलावलेली तातडीची बैठक तसेच नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रभू रिअलेटर्सच्या बांधकामांवर करवाईचे निर्देश या सगळ्या गोष्टी दिल्लीतून फर्मान जारी झाल्यामुळेच निघाल्याचा अंदाजही खासदार फर्नांडिस यांनी सांगितले.
मानवी संकट
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या घटनेला “मानवी संकट” असे संबोधत प्रशासनाच्या अपुऱ्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्रात खासदारांनी नमूद केले आहे की, अधिकृत आकडेवारीनुसार १५६ नागरिक, त्यात अल्पवयीनांचाही समावेश असून, अतिसाराने बाधित झाले आहेत. मात्र अनेकांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेतल्याने प्रत्यक्षात बाधितांची संख्या जवळपास ३०० पर्यंत असू शकते.
प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी, भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाने तातडीने विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकावर गंभीर आरोप
खासदारांनी संबंधित बिल्डरवर अनेक गंभीर आरोप केले असून त्यात वर्षानुवर्षे गृहनिर्माण सोसायटी न स्थापन करणे, रहिवाशांकडून घेतलेल्या पैशांचा हिशेब न देणे, एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा) सुरुवातीपासूनच निकामी असूनही दुरुस्ती न करणे, परवानगीशिवाय बोअरवेलमधून पाणी उपसा करणे, दूषित पाणी पाणीपुरवठ्यात मिसळणे, नाल्यांमध्ये व मोकळ्या जागेत असंसाधित सांडपाणी सोडणे, रहिवाशांना घाबरवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
प्रदूषण मंडळाच्या कारवाईचा उल्लेख
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी बिल्डरला दोषी ठरवून ₹१२.५ लाख दंड ठोठावला होता. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.
तातडीच्या कारवाईची मागणी
या प्रकरणात संबंधित बिल्डर तसेच निष्क्रिय राहिलेल्या शासकीय विभागांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही केवळ तात्पुरती उपाययोजना नसून दीर्घकालीन व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना प्रत
या पत्राची प्रत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, आरोग्य विभाग, जीएसपीसीबी तसेच सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.




