सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

हत्तीच्या उपद्रवावर उपाययोजना आखण्यात अपयश

गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील मोपा, तांबोसे, तोरसे, उगवे आदी गावांमध्ये ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने निर्माण केलेल्या उपद्रवापुढे हताशपणे बघ्याची भूमिका घेतलेल्या सरकारने अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कित्येक वर्षे कष्ट करून उभारलेली कवाथी, पोफळी, केळीची पिके एका फटक्यात हत्तीने उध्वस्त केली. पणजीत बसून सरकारकडून होणारी भरपाईची भाषा हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
तिळारी-दोडामार्ग परिसरातून ‘ओंकार’ नावाचा हत्ती गोव्याच्या हद्दीत घुसला आहे. १३ सप्टेंबरपासून या हत्तीने पेडणे तालुक्यातील विविध गावांमध्ये हैदोस घातला आहे. शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असून त्यांची पिके पायदळी तुडवून आणि सोंडेने उखडून हत्तीने मोठे नुकसान केले आहे. वनाधिकारी आणि कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना या शेतकऱ्यांची खबर घेण्याचीही फुरसत मिळालेली नाही.
एकीकडे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे हत्तीच्या दहशतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच वेळी सरकार ‘सेवा पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबवत आहे. लोकांना शेती करण्याचा सल्ला देणाऱ्या सरकारकडूनच शेतकऱ्यांची अशी जाहीर विटंबना होत असल्यामुळे कुणीही शेतीकडे वळणार नाही, अशी टीका स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
भरपाईने नुकसान भरून येणार नाही
एखाद्या शेतकऱ्यासाठी त्याचे पीक हे मुलांबाळांसारखेच असते. हे पीक घेण्यासाठी प्रचंड कष्ट, मेहनत आणि काळजी घ्यावी लागते. या पिकांमध्ये शेतकऱ्यांचा जीव असतो. मात्र सरकार भपकी वक्तव्ये करून आणि भरपाईच्या गोष्टी करत शेतकऱ्यांच्या भावनांची मस्करी करत आहे, अशी नाराजी शैलेश सामंत यांनी व्यक्त केली.
त्यांच्या बागायतीतील सुमारे ३० ते ४० कवाथीची झाडे आडवी करण्यात आली. याशिवाय केळी, पोफळीच्या पिकांचेही अन्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. केवळ भरपाईने हे नुकसान भरून येणार नाही. हे पीक पुन्हा घेण्यासाठी वर्षे लागतील आणि नव्याने हिंमत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या भावना किंवा संवेदना समजू न शकणाऱ्या सरकारला शेती म्हणजे रंगमंचावरील एखादे नाटक वाटते की काय, असा खडा सवाल सामंत यांनी उपस्थित केला.
एका हत्तीसमोर सरकारची ही हतबलता सरकारी यंत्रणांचे अपयश उघड करणारी ठरते. हाच हत्ती उन्मत्त होऊन लोकवस्तीत शिरला, तर लोकांच्या जिविताची भरपाई देऊन सरकार फोटोसेशन करणार आहे की काय, असा संतप्त सवाल सामंत यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Panaji: The Goa Pradesh Mahila Congress has extended support to victims and families affected by the alleged Curchorem sex scandal, raising serious concerns over institutional gaps and the lack of…

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…