तंदुरूस्त तरूणाई देशाची ताकद

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण पिढी आपल्याकडे आहे. पण ही पिढी सुदृढ आणि निरोगी नसेल, तर हे देशासमोरील मोठे संकट ठरू शकते.

गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानी संस्थेत गेल्या वर्षभरात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब शैक्षणिक विश्वासार्हतेला बाधक ठरणारी आहे. भारताच्या बौद्धिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अशा संस्थांमध्ये अशा घटना घडणे हे देशासाठी चिंताजनक आहे. प्रगल्भ आणि उच्चशिक्षित भावी पिढी घडविण्यात अशा संस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. या घटनांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. मानसिक तणाव, अभ्यासाचा दबाव, किंवा मनोवस्थेचे व्यवस्थापन हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय, पालकांकडून मुलांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या अभ्यासक्रमाची सक्ती करणे, प्रवेशानंतर अभ्यासक्रम कठीण वाटणे आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक अवस्थेमुळे एखादी टोकाची कृती करणे, हेही संभाव्य कारणे असू शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, मागील चार घटनांच्या चौकशीचा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही. त्यामुळे या घटनांची कारणे खाजगी आणि वैयक्तिक होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. संस्थेच्या प्रतिष्ठेमुळे गोपनीयता पाळली जाते, पण त्या आड दुर्लक्ष किंवा बेजबाबदारपणा लपवला जातोय का, याचीही शंका निर्माण होते. अलिकडे मृत्यू पावलेल्या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रकरणात, आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून पुढे आला आहे. झोपेत असताना उलटी झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मधु घोडकीरेकर यांनी दिली. संबंधित विद्यार्थी डिप्रेशनवरील औषधे घेत होता. आतापर्यंतच्या पाचपैकी तीन प्रकरणांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष हे मुख्य कारण असल्याचेही डॉ. घोडकीरेकर यांनी स्पष्ट केले. या विषयावर आता सखोल चर्चा होणे अत्यावश्यक आहे. आरोग्य आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासंबंधी विशेष संशोधन आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. तरुणांच्या आरोग्याची आणि विशेषतः तंदुरुस्ती खालावत चालल्याचे अहवाल यापूर्वीही आले आहेत. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण पिढी आपल्याकडे आहे. पण ही पिढी सुदृढ आणि निरोगी नसेल, तर हे देशासमोरील मोठे संकट ठरू शकते. बदलती जीवनशैली, शारीरिक स्थूलता आणि मानसिक तणाव यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिकडे तरुण वयातच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. रक्तदाब आणि मधुमेहाच्या जाळ्यात तरुणाई अडकत चालली आहे. या सर्व विषयांवर व्यापक जनजागृती, चर्चा, वादविवाद होणे आवश्यक आहे. त्यातून जीवनशैली बदलण्यासाठी कठोर उपाययोजना आखणे गरजेचे आहे. सिगारेट आणि मद्यसेवनाचे प्रमाण वाढत आहे. जंक फूड आणि असुरक्षित अन्न याचेही दुष्परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. बिट्स पिलानी संस्थेतील या दुर्दैवी घटनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना आखणे आणि भविष्यात अशा घटना टाळणे ही सरकार, संस्था आणि समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे.

  • Related Posts

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    आज गरज आहे ती भीती झटकण्याची, स्वार्थ बाजूला ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मार्गाने संघटित होण्याची. तरुणाई ही कोणत्याही समाजाची ऊर्जा असते. समाजाचे वर्तमान आणि भविष्य यांच्यामधील सर्वांत मजबूत पूल…

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    You Missed

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    मायेची सावली हरपली…

    मायेची सावली हरपली…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth