विचित्र भांडण !

ऑगस्ट क्रांती दिन आला की मला एक विचित्र भांडण आठवते. कारण या भांडणाला बेचाळीसच्या ‘चले जाव’ आंदोलनाचा संदर्भ आहे. स्वातंत्र्य आंदोलनाचा संदर्भ म्हटल्यावर असे वाटते की ब्रिटिश विरोधी स्वातंत्र्यलढ्याला कौतुकाने अलंकारिक भाषा वापरायची म्हणून भांडण म्हटले की काय. कदाचित हे भांडण कोणा भारतीयाचे कोणा ब्रिटीश सोल्जरासोबत झालेले भांडण असेल असेही वाटणे शक्य आहे. कदाचित ब्रिटिशधार्जिण्या भारतीयासोबत स्वातंत्र्याकांक्षी भारतीयाने केलेले हे भांडण असावे असेही वाटणे शक्य आहे. पण हे भांडण यापैकी कोणतेही नाही.
झाले होते असे की ‘चले जाव’च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने माझ्या आजोबांना एक वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आपला कुमारवयीन मुलगा तुरुंगवास भोगतोय याचा माझ्या पणजोबांना खूप त्रास होत होता. त्यांनी आजोबांच्या शिक्षेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दंड भरून त्यांना सोडवून आणण्यासाठी अर्ज केला. त्यामुळे आजोबांची सुटका झाली आणि ते घरी परतले.
त्यानंतर काही महिन्यांनी पणजोबांचे स्नेही असलेले आमच्याच जिल्ह्य़ातील स्वातंत्र्यसैनिक आबा वालावलकर आमच्या घरी आले. का? चक्क भांडण करायला. ते माझ्या पणजोबांवर संतापले होते. माझ्या पणजोबांनी काय चूक केली होती? त्यांनी आपल्या मुलाला दंड भरून सोडवून आणताना आबांच्या मुलाला देखील सोडवून आणले होते. कारण आबांचे चिरंजीव हे माझ्या आजोबांचे मित्र होते आणि दोघेही सोबतच तुरुंगात गेले होते. त्यामुळे आपल्याच एकट्याच्या मुलाला कसे सोडवून आणणार, असे वाटून त्यांनी आबांच्या मुलालाही सोडवून आणले होते.
आबांना मुळात दंड भरून सुटून येणे हे मुल्याशी प्रतारणा करणारे वाटत होते. सविनय कायदेभंगाचे मुल्यच हे होते की आम्ही सरकार देत असलेली वाटेल ती शिक्षा भोगू, पण माघार नाही घेणार. तुम्ही तुरुंगात घाला नाहीतर फासावर चढवा. आम्ही तुमचा कायदाही पाळणार नाही की माफीही मागणार नाही.
आबा म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या मुलाला सोडवून आणलेत हे ठीक आहे. तुम्हाला झेपले नाही हा तुमचा कमकुवतपणा झाला. पण तुम्ही माझ्या मुलाला का सोडवून आणलेत? तुम्हाला हा शहाणपणा करायला कोणी सांगितला होता.’
आबांच्या चिरंजीवांची तब्येत त्या काळात बिघडली होती. पणजोबांनी तब्येतीची सबब पुढे केली. त्यावर आबा म्हणाले, ‘फारफार तर काय झाले असते? माझा मुलगा तुरुंगात मेला असता. असंख्य लोक तुरुंगात मरत नाहीएत का? स्वातंत्र्य काय बलिदान केल्याशिवाय फुकाफुकी मिळेल का?’
पणजोबांना आबांच्या पुढ्यात शरमेने मान खाली घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
खरं तर ही सगळी गोष्ट घडली ती माझ्या आजोबांच्या लग्नापूर्वी. म्हणजे माझ्या बाबांच्याही जन्मापूर्वी. खरंतर ही गोष्ट विसरूनच जायला हवी होती. शिवाय त्यात माझ्या पणजोबांची कमजोरीच उघड होत होती. पण तरीही ही गोष्ट आमच्या घरात वारंवार सांगितली गेली. माझ्यापर्यंत म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत ही गोष्ट पोचली. कारण आबांच्या कठोर विचार करण्याचं मर्म पणजोबांना कळलं होतं.
मला कमाल वाटते ती आबांसारख्या माणसांची! ही मंडळी ‘मी व माझे’ याच्या पलीकडे कशी गेली? त्यांनी आपल्या मनावर असे संस्कार कसे केले? आम्ही आबांच्या जागी असतो तर आम्ही आबांसारखा विचार करु शकलो असतो का?
– डॉ. रूपेश पाटकर

  • Related Posts

    MLAs Cannot Control Behaviour of Pass Holders

    GFP MLA Vijay Sardesai responds to the notice of speaker in Assembly Panaji, 10 : Vijai Sardesai on Tuesday responded in the Goa Legislative Assembly after Speaker Dr. Ganesh Gaonkar…

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…