विरोधकांनी भानावर यावे

एकीकडे जनता सरकारला धडा शिकवण्याची मानसिकता बाळगून असताना विरोधकांनी आपल्या बेजबाबदार वर्तनातून जनतेची निराशा करणे ही सर्वांत मोठी चूक ठरेल.

राज्यात एकीकडे हडफडे अग्निकांडानंतर भ्रष्टाचार, बेकायदा आणि अनागोंदी कारभार यावरून सरकार व प्रशासन टीकेचे लक्ष्य बनले आहे. दुसरीकडे आगामी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना सरकारविरोधी वातावरणाचा उपयोग करून अधिकाधिक लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची नामी संधी असताना, विरोधकांकडून सुरू असलेल्या बेजबाबदार आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकांची साफ निराशा झाली आहे.
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांइतकीच विरोधकांचीही संविधानिक आणि नैतिक जबाबदारी असते. केवळ सत्ता हेच लोकशाहीचे अंतिम ध्येय नाही, तर या सत्तेवर योग्य वचक ठेवण्याची जबाबदारी विरोधकांनी निष्ठेने पार पाडण्याची गरज आहे. हे जर झाले नाही तर सत्ता अनियंत्रित बनू शकते. आज केंद्रात आणि राज्यात तीच परिस्थिती आहे. सत्ताधारी एवढे मदांध झाले आहेत की ते विरोधकांना कस्पटासमान समजतात आणि त्यातूनच लोकशाहीच्या मूळ ढाच्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कधीकाळी काँग्रेसच्या कार्यकाळात इंदिरा गांधी यांच्याविरोधात राष्ट्रव्यापी उठाव झाला होता आणि त्यांना सत्तेवरून खाली उतरावे लागले होते. आज भाजप त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली होती, तर आगामी काळात भाजप देखील तसेच करू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी देशाला नेमक्या कुठे नेणार आहेत, हेच समजत नाही.
गोव्यात गेली बारा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने लोकांना भ्रमनिरास केला आहे. तरीही सगळ्या निवडणुका भाजपकडून जिंकल्या जातात म्हणून लोक आपल्यासोबत आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. गत विधानसभेत भाजपला २० जागा मिळाल्या होत्या, पण विरोधात १९ आमदार निवडून आले होते. यानंतर विरोधकांना आपल्याकडे आणून भाजपने बहुमत प्राप्त केले असले तरी त्या विरोधी १९ आमदारांमागे भाजपविरोधी जनभावना होती, हे विसरून चालणार नाही.
विरोधी पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. जोपर्यंत ही विश्वासार्हता ते पुन्हा प्राप्त करणार नाहीत, तोपर्यंत लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काँग्रेस अपयशातून काहीच बोध घेत नाही, हे स्पष्टपणे जाणवते. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई हे नेमके काय करावे या संभ्रमात आहेत आणि आरजीपी अजूनही राजकीय परिपक्वता दाखवताना दिसत नाही. भावना आणि वास्तव यात फरक असतो. राजकीय पक्षाला संवेदनशीलता हवीच, परंतु राजकारणात लागणारी प्रगल्भता आणि परिपक्वतेची गरज अधिक महत्त्वाची आहे.
अपमान सहन करण्याची, अनिच्छा पोटात गिळण्याची आणि दूरदृष्टीने एक पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवावी लागते. एखादा राजकीय नेता आपल्या भावना आणि संवेदना या पक्षापेक्षा अधिक प्रखर समजू लागतो तेव्हा त्या पक्षाच्या प्रगतीला खंड पडतो.
विरोधकांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा होती. ते झाले नाही तरीही चालेल, पण विरोधकांनी आपल्या मूळ ध्येयाकडे नजर ठेवण्याची गरज आहे. या एकत्र येण्याला कोण जबाबदार याचे दाखले देण्यासाठी आरोप-प्रत्यारोपांची गरज नाही. एकीकडे जनता सरकारला धडा शिकवण्याची मानसिकता बाळगून असताना विरोधकांनी आपल्या बेजबाबदार वर्तनातून जनतेची निराशा करणे ही सर्वांत मोठी चूक ठरेल. मग जनतेला दोष देण्याचा कुठलाच अधिकार विरोधकांना राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

  • Related Posts

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील काही करू शकणार नाहीत. कारण ते सत्तेत आणि या पदावर असताना या मंत्र्यांचा दबाव कायम त्यांच्यावर राहावा, या हेतूनेच श्रेष्ठींनी ही व्यक्ती त्यांच्या मागे…

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    सरकारने चिंबलकरांना अधिक वेठीस न धरता हा अट्टाहास सोडावा आणि या दोन्ही प्रकल्पांसाठी पर्यायी जागा शोधून या विषयाला पूर्णविराम द्यावा, एवढेच सांगावेसे वाटते. सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल गावातील आदिवासी समाज नियोजित…

    You Missed

    15/01/2026 e-paper

    15/01/2026 e-paper

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    विधानसभेचे पावित्र्य जपा!

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    चिंबलकरांच्या आंदोलनाला जॅमरचा चाप

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    युनिटी मॉलचा अट्टाहास का ?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    हडफडे दुर्घटनेच्या दोषींना सरकारी अभय?

    14/01/2026 e-paper

    14/01/2026 e-paper