पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची भेट
गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी):
राज्यातील २० कलमी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या घरांना मालकी हक्क देण्यासंबंधीचे परिपत्रक अखेर महसूल खात्याने जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वसंध्येला हे परिपत्रक जाहीर करून राज्यातील सुमारे ६ हजार कुटुंबांना सरकारने ही विशेष भेट दिली आहे.
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने यासंबंधीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने संबंधित ठरावाला मंजुरी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर, या नागरिकांना संरक्षण देण्यासाठीच सरकारने हे पाऊल उचलले आहे. पर्वरी सुकुर येथील निलेश च्यारी यांचे घर पाडल्यानंतर खंडपीठाकडून सर्व बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
तीन प्रकारांत विभागणी
२० कलमी कार्यक्रमाअंतर्गत घरांची विभागणी तीन प्रकारांत करण्यात आली आहे:
- योजनेअंतर्गत वितरीत भूखंडांवर उभारलेली घरे – त्यांना पूर्ण मालकी देणे.
- वितरीत झालेले पण ताब्यात न घेतलेले भूखंड – ते सरकारच्या ताब्यात परत घेणे.
- बेकायदा पद्धतीने हस्तांतरित भूखंड किंवा घरे – सध्या ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना मालकी देणे.
सरकारने अधिसूचित केलेल्या भूखंडाच्या एक विसावा भाग इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. मालकी मिळाल्यानंतर, अनधिकृत बांधकाम नियमन कायद्यानुसार स्वतंत्र अर्ज सादर करून त्या घरांचे नियमन करावे लागणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सरकारने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.





