जाईचा सुगंध, आमचा अभिमान…

“चला, एकजूट होऊ” ही हाक केवळ शब्दांत मर्यादित नाही, ती एक साक्ष आहे, एक प्रतिज्ञा आहे आपल्या मातीतून उगम पावलेल्या संस्कृतीच्या संरक्षणाची. म्हार्दोळमधील जाई फुलांच्या सुगंधातून केवळ आमच्या बागांनाच नव्हे, तर आमच्या अस्तित्वालाच एक ओळख मिळाली आहे आणि आता हीच ओळख काही स्वार्थी, जमिनी हडपणाऱ्या दलालांच्या गालबोटामुळे संकटात सापडली आहे.
म्हार्दोळ गावातील पारंपरिक जाई बागायतीचा वारसा आज मोठ्या संकटात आहे. आमच्याच भूमीत अनेक पिढ्यांपासून फुलवलेल्या या जाई फुलांच्या बागा केवळ शेती नाहीत त्या आमचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक आधार आहेत. आज काही भू-माफिया आणि दलाल गैरमार्गाने, फसवणूक करून किंवा दबाव टाकून या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेकायदेशीर हालचालीमुळे आमचे पर्यावरण, स्थानिक जैवविविधता आणि लोकजीवन धोक्यात आले आहे. अशा प्रकारे जमिनी बळकावून आमच्या पूर्वजांच्या कष्टांचा, वारशाचा आणि गावाच्या ओळखीचा विनाश केला जात आहे.
हे जाईचे मळे फक्त फुलबागा नाहीत हा आमचा वारसा आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या नाईक फुलकार समाजाने या बागा जपल्या, वाढवल्या आणि त्यांच्याशी नातं जोडलं. प्रत्येक फुलाच्या सुगंधात त्या समाजाचा घाम मिसळलेला आहे, कष्टांची चव आहे आणि संस्कृतीचा श्वास आहे. ही बाग आमच्यासाठी फक्त शेती नाही ती एक परंपरा आहे, जी आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी जतन करत आहोत.
आज मात्र ही संस्कृतीच धोक्यात आली आहे. भूमी माफियांनी आणि दलालांनी आमच्या जमिनीवर नजर ठेवली आहे. त्यांच्या डोळ्यांत सुगंध नाही, फक्त चकचकीत नोटा आहेत. त्यांच्यासाठी ही जाईची बाग म्हणजे ‘विकासासाठी उपलब्ध भूखंड’… पण आमच्यासाठी ती आईच्या कुशीतल्या परिमळासारखी आहे.
हे फक्त एक जमीन हडप प्रकरण नाही हे सांस्कृतिक नरसंहार आहे.
जाईच्या फुलांचा वास केवळ हवेत नाही, तो आपल्या ओळखीत आहे. जर ही बाग गेली, तर फक्त उत्पन्नाचं नुकसान होणार नाही, तर शतकानुशतक जपलेला वारसा, गावांची ओळख, लोककला, धार्मिक परंपरा आणि जैवविविधता यांचंही नुकसान होईल. ही बाग म्हणजे भूमिपुत्रांची ओळख आहे. ही ओळख हिरावून घेणं म्हणजे त्यांच्या इतिहासावर आणि भविष्यावर एक क्रूर आघात आहे.
हे आम्ही कदापि सहन करणार नाही. एकजूटच आपलं अस्त्र आहे, आणि आपली शक्तीही. आम्ही एकवटू, आवाज उठवू — आमच्या जमिनीसाठी, आमच्या जाईसाठी, आमच्या अस्तित्वासाठी. कायद्यानं, हक्कानं आणि जिद्दीनं झुंज देऊ. कारण हे केवळ शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, तर एका संस्कृतीच्या अस्मितेचा लढा आहे.
हे लक्षात ठेवा “जाई हरवली, तर गाव हरवेल; गाव हरवलं, तर संस्कृतीच नष्ट होईल.” ज्यांच्यासाठी ही माती फक्त नफ्याचं साधन आहे, त्यांना आपल्याला भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि कायदेशीर अशा सर्व अंगांनी प्रत्युत्तर द्यावं लागेल.
आमची जाई, आमची ओळख, आमचं स्वाभिमान. आता वेळ आली आहे की आपण सगळे एकत्र येऊ गांवकरी, विद्यार्थी, महिला बचतगट, स्थानिक संस्था सगळ्यांनी पुढे यायला हवं. “स्वाभिमान जपायचा असेल, तर जमिनीला मातीसारखं नका समजू, तिला आईसारखं जपा.” आपण आपल्या जाईचा सुगंध बाजारात पोहोचवू शकतो, पण त्याचं मूळ ती माती इथेच आहे. ती गेली, तर सुगंधही हरवेल.
चला, एकजूट होऊ… जमिनी वाचवू, जाई जपू, दलालांना विरोध करू, आपला वारसा टिकवू, कारण ती फक्त फुलं नाहीत, हे आमचं अस्तित्व आहे!
– गौरेश तुळशीदास गावडे
आकार, म्हार्दोळ – फोंडा

  • Related Posts

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    WRD’s Alleged Covert Move: Deltins Land to Be Excluded from Tillari Command Area

    A fresh notification has been issued by the Command Area Development Authority under the State Water Resources Department regarding the Tillari Irrigation Project. As per the notification, an additional 29,29,677…

    You Missed

    09/03/2026 e-paper

    09/03/2026 e-paper

    टॅक्सीकरांमुळेच गोव्याची बदनामी !

    टॅक्सीकरांमुळेच गोव्याची बदनामी !

    विकास नेमका कुणाचा ?

    विकास नेमका कुणाचा ?

    07/03/2026 e-paper

    07/03/2026 e-paper

    ”ये अंदर की बात है…”

    ”ये अंदर की बात है…”

    “दहशतवादी” टिप्पणी पेटली !

    “दहशतवादी” टिप्पणी पेटली !