आत्महत्येचा संशय; संस्थाचालकांसमोर पेचप्रसंग
गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
सांकवाळ येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स पिलानी) संस्थेत वर्षभरातील पाचव्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला असून, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संस्थाचालकांसमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
बिर्ला उद्योग समूहाच्या प्रतिष्ठित बिट्स पिलानी संस्थेमधील गेल्या वर्षभरातील ही पाचवी दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी संस्थेकडून सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात आल्या असूनही, या घटना सुरूच असल्यामुळे संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनांमागची नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत आहे.
ही संस्था प्रतिष्ठित असल्यामुळे तपास यंत्रणा खरोखरच निपक्षपातीपणे तपास करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संस्थेची बदनामी किंवा विश्वासार्हतेला तडा जाण्याची भीती असल्यास, संबंधित कारणे मोकळेपणाने समोर येणे कठीण ठरते. त्यामुळे या प्रकरणांच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे मत अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या सर्व घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू असला तरी, यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पाचव्या मृत विद्यार्थ्याचे नाव ऋषी नायर असून, तो २० वर्षांचा होता. डिसेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये प्रियान सिंग, मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई, मे २०२५ मध्ये कृष्णा कसेरा आणि ऑगस्ट २०२५ मध्ये कुशाग्र जैन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व मृत्यूंबाबत संस्थेच्या अंतर्गत चौकशीसह पोलिस तपास सुरू आहे. संस्थेमधील प्राध्यापकांसाठी मानसिक आरोग्य प्रथमोपचार प्रमाणित चाचणी घेण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी २४ तास समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासक्रमात बदल करून मानसिक तणाव व्यवस्थापनाचे विषय समाविष्ट करण्याचा विचारही संस्थेने सुरू केला आहे.
या सर्व उपाययोजनांनंतरही मृत्यूंचे सत्र सुरूच असल्यामुळे संस्थाचालकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.






