मुलं लहान असताना त्यांच्यावर शिकवण, सवयी, मूल्यं किंवा कौशल्यं सहजपणे बिंबवता येतात आणि म्हणूनच लहानपणीच त्यांना अशा गोष्टींकडे वळवण्याची गरज आहे. या अनुषंगानेच इंग्रजीत ''कॅच देम यंग'' असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे.
आपल्याकडे क्रीडा क्षेत्रात निव्वळ खेळखंडोबा सुरू आहे. अनेक क्रीडापटू वैयक्तिक पातळीवर विविध क्षेत्रात झेप घेऊन देशाला आणि राज्याला यश मिळवून देतात. मग कुठेतरी विधानसभेत अभिनंदन ठराव घेऊन, नंतर आर्थिक सहाय्यतेच्या नावाखाली फोटोसेशन करून मोकळे होण्यावरच सरकारची भीड आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. स्क्वॅशपटू यश फडते याच्याबाबतीत घडलेला प्रकार हा निंदनीय तर आहेच, परंतु अशोभनीय आहे असेही खेदाने म्हणावे लागते.
हे सगळे सांगण्याचे तात्पर्य काय तर, आपल्याकडे गेली बारा वर्षे भाजपचे सरकार आहे. धर्म, संस्कार, नैतिकता आदींचा ठेका या लोकांकडेच असल्यागत नेहमीच इतरांना ज्ञान पाजण्याचा या लोकांचा धंदाच बनलेला आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत या पक्षाच्या लोकांची झाली आहे. आपल्या अनैतिक, भ्रष्ट, स्वार्थी आणि मतलबी कृतीतून या पक्षातील काही नेत्यांनी वास्तविक धर्म, नैतिकता, संस्कार या शब्दांनाच काळीमा फासला आहे, असे म्हणता येईल. स्वार्थी मनोवृत्तीतूनच चुकीची धोरणे आखली जातात आणि त्यातूनच चुकीच्या गोष्टींना आपोआप बळकटी प्राप्त होते.
हल्लीच झालेल्या हिवाळी अधिवेशनात अबकारी खात्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक ठरली आहे. अबकारी खात्याकडून शाळांजवळ तब्बल ९१ मद्यालयांना परवाने दिले आहेत. शाळा, धार्मिक स्थळांच्या शेजारी यापूर्वी मद्यालयांना परवाने देण्यावर निर्बंध होते. अजूनही आहेत; परंतु हे प्रस्ताव खास अबकारी मंत्र्यांकडे, अर्थात मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जातात आणि त्यांच्या मंजुरीने हे परवाने दिले जातात, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आता राज्याचे अबकारीमंत्री हेच राज्याचे मुख्यमंत्री आणि तेच शिक्षणमंत्री. शिक्षणमंत्र्यांकडूनच शाळेच्या परिसरात मद्यालयांना मंजुरी देणे याला नेमके काय म्हणावे? बाकी शाळेत जाताना आणि शाळेतून घरी येताना सर्वाधिक मुलांना कशाचे दर्शन घडते तर ते कॅसिनो फलक, मद्यालये, वाईन दुकानांचाच अधिक भरणा आहे. गावोगाव जनरल स्टोअर्स बंद पडली आहेत आणि जिथे तिथे वाईन स्टोअर्स खुली होत आहेत. मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेला विकसित गोवा तो हाच काय, असा प्रश्न विचारावा लागेल.
मुलांवर किंबहुना युवकांवर कोणते संस्कार व्हावेत किंवा त्यांच्यावर कुठल्या गोष्टींचा प्रभाव पडावा यासाठी धोरणात्मक आखणी गरजेची आहे. अगदी दाबोळी ते मोपा विमानतळापर्यंत, तसेच राजधानीपर्यंत सर्वत्र कॅसिनोंचे भलेमोठे फलक हे काय दर्शवतात? ह्याच विधानसभेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी राज्यात दारूबंदी लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीची सर्वांनी थट्टा केली.
दारूमुळे उद्भवलेल्या भयावह परिस्थितीची जाणीव करून देणारी आकडेवारी आम्ही यापूर्वीच्या अग्रलेखात स्पष्ट केली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय वृत्तपत्रात गोव्याच्या पत्रकार निदा सय्यद यांनी ख्रिस्ती धर्मात दारूमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर एका संशोधन पेपरचा संदर्भ देत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात ख्रिस्ती धर्मगुरू तसेच चर्च संस्थेच्या कारभारातील लोकच दारूच्या व्यसनाला कसे बळी पडले आणि त्यातून काय काय प्रश्न निर्माण झाले, यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.
राज्याची दिशा निश्चित होण्यात धोरणे महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. ही आखणी आणि राबवणी हे जरी कठीण काम असले तरी दूरदृष्टीचा विचार करूनच ही पावले घ्यावी लागतात. ही लागू करताना कदाचित अनेकांचा विरोध असेल किंवा अनेकांकडून टीका केली जाईल; परंतु कालांतराने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तात्कालिक विचारापेक्षा दूरदृष्टी ठेवूनच धोरणे आखली जातात. आपल्याला ही सवय करून घ्यावी लागेल; अन्यथा तात्कालिक समाधानाच्या नावाखाली आपल्या गोव्याचे भवितव्य बरबाद व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.








