आंदोलकांचा मात्र सावध पवित्रा
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
चिंबलच्या विषयावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी चिंबलकरांना बैठकीसाठी बोलावले आहे. तळ्यार तळ्याच्या सभोवतालच्या परिसराचे सर्वेक्षण अखेर आज पूर्ण करण्यात आले. युनिटी मॉलचा विस्तृत प्रकल्प अहवाल आणि सर्वेक्षण अहवाल मिळेपर्यंत बैठकीला हजर राहणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
दरम्यान, चिंबलवासियांनी ३० रोजी पणजीत महाआंदोलनाची घोषणा केली आहे. या महाआंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात जागृती सुरू आहे. संपूर्ण राज्यातून आदिवासी समाजबांधव, इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच जागृत नागरिकांना या महाआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चिंबलवासियांनी केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे ३० आणि ३१ जानेवारी रोजी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. ३० रोजी आमदार व कोअर समितीची बैठक तर ३१ रोजी ताळगांव येथील कम्युनिटी सभागृहात मंडळ कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर चिंबलकरांचे महाआंदोलन भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने चिंबलकरांची समजूत काढून हे महाआंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून सर्व पातळीवर आटापिटा सुरू असल्याची खबर आहे.
अजित पवार यांचा मृत्यू
बारामतीत दुर्दैवी विमान अपघात
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. आपल्या खाजगी विमानातून ते बारामतीमध्ये लँडिंग करत असताना विमानाचा भडका उडाला आणि त्यात त्यांच्यासह सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. या विमानात त्यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.
सहकार क्षेत्र आणि साखर कारखाना उद्योगातून त्यांचे नेतृत्व घडले. लोकसभेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगळा गट तयार झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता दिली होती.






