ठोस उपाययोजना मॉडेल राबवण्याचे वनमंत्र्यांचे आश्वासन
गांवकारी, दि.१० (प्रतिनिधी)
राज्यात ठिकठिकाणी माकडांनी उच्छाद मांडून शेतकरी व बागायतदारांची दमछाक केली आहे. या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात वनखाते अपयशी ठरल्याचा मुद्दा डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर वनमंत्री विश्वजित राणे यांनी लवकरच ठोस उपाययोजना मॉडेल राबवण्याचे आश्वासन दिले.
प्रश्नोत्तराच्या तासाला डॉ. शेटये यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. केवळ डिचोली नव्हे तर संपूर्ण राज्यातच रानटी माकडांनी उच्छाद मांडला आहे. शेतकरी व बागायतदार हवालदिल झाले असून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकार दरवेळी उपाययोजनांचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात काहीच होत नसल्याची लोकांची भावना आहे. रानांत फळझाडांची लागवड व माकडांना हाकलण्यासाठीची यंत्रणा उपयोगी ठरत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठोस धोरण आखू – विश्वजित राणे
मानवी–वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केरळ आणि कर्नाटकच्या धर्तीवर ठोस धोरण आखण्याचे आश्वासन वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिले. या राज्यांच्या मॉडेल्सचा अभ्यास करून सर्वोत्तम पद्धती गोव्यात लागू करू, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून ठोस आराखडा निश्चित केला जाईल.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सूचित केल्यानुसार केरळ व कर्नाटकच्या धोरणांचा अभ्यास करून उत्तम पद्धती गोव्यात लागू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. राणे यांनी सांगितले की राज्यात बिबटे, गवे, माकडे तसेच इतर वन्यप्राणी वाढत्या प्रमाणात निवासी भागात येत आहेत. “वनक्षेत्रात योग्य परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मानवी–वन्यप्राणी संघर्षावर उपाययोजना करण्यासाठी ३.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता आणि शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनीही चिंता व्यक्त केली.





