तरीही ‘आवडले म्हणूनच नाही खाल्ले’ ही स्वामी तुरीयानंदांची वृत्ती मनात कायमची घर करून राहिली. तिचा नेमका अर्थ मला नंतर हळूहळू उमगला.
मी लहान असतानाची गोष्ट. बाबांसोबत मी एका उत्सवाला गेलो होतो. तिथे एक संन्यासी आले होते. अनेक लोक त्यांच्या भोवती बसून ते जे सांगत होते, ते लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे भगवे वस्त्र, लांब दाढी, शांत चेहरा आणि धीरगंभीर आवाज या सगळ्यांनी मला कुतूहल वाटले. तिथून परत निघताना माझ्या डोक्यात त्या संन्याश्याचाच विचार होता. परत येताना मी बाबांशी त्यांच्याविषयी बोललो.
बाबा म्हणाले, “जे लोक आपल्या जीवनाचं ध्येय परमेश्वरप्राप्ती ठरवतात, ते संन्यास घेतात. पण संन्यास घेणं सोपं नसतं. संन्यास म्हणजे फक्त भगवे कपडे घालणे नव्हे; त्यासाठी मोठी साधना करावी लागते!”
मी त्यादिवशी पहिल्यांदाच ‘साधना’ हा शब्द ऐकला.
“बाबा, साधना म्हणजे काय?” मी विचारले.
माझ्या प्रश्नावर बाबा काही क्षण गप्प राहिले आणि मग म्हणाले, “रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते, स्वामी तुरीयानंद. बेलूर मठात रामकृष्णांचे संन्यासी शिष्य राहत. तिथे मंदिरातील रोजच्या पुजेनंतर मिष्टान्न नैवेद्य दाखवला जाई आणि त्याचा प्रसाद दररोज एका संन्याशाला दिला जाई.
एकदा प्रसाद घेण्याचा नंबर स्वामी तुरीयानंदांचा होता. ब्रह्मचारी प्रसाद घेऊन आला. स्वामीजींनी सर्व प्रसाद न घेता, पळीने थोडासा प्रसाद हातावर घेतला आणि तोंडात टाकून पेला परत केला. खरेतर सर्व प्रसाद त्यांनी संपवायचा होता, पण त्यांनी थोडासाच घेतला.
त्यावर ब्रह्मचारीने विचारले, ‘आज चव चांगली नाही का?’
स्वामीजी उत्तरले, ‘चव उत्तम आहे म्हणूनच थोडासा घेऊन परत करतोय!’
स्वामीजींचं हे वर्तन म्हणजे साधना. त्यांच्या जागी तू असतास तर काय केलं असतंस? चव चांगली लागली म्हणून भांडे चाटून पुसून दिलं असतंस ना! संन्याशाने आपल्या मनाला संयम लावायचा असतो. मनाला संयम लावणे हीच साधना! समजलं का?”
मी ‘हो’ म्हणालो. पण त्या वेळी बाबा काय सांगू पाहत होते ते मला पूर्णपणे कळलं नव्हतं. तरीही ‘आवडले म्हणूनच नाही खाल्ले’ ही स्वामी तुरीयानंदांची वृत्ती मनात कायमची घर करून राहिली. तिचा नेमका अर्थ मला नंतर हळूहळू उमगला.
— डॉ. रुपेश पाटकर






