रस्त्यासाठी जमीन दिल्यावरून कोमुनिदादमध्ये गोंधळ
गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी)
कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाच्या रस्त्यासाठी सर्वण कोमुनिदादची जमीन दिली आहे. ही जमीन कोमुनिदादच्या घटकांना विश्वासात न घेता परस्पर देण्यात आली. या विषयावरून आता सर्वण गावातील कोमुनिदाद घटक नाराज झाले आहेत. आपला गाव वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कारापूरच्या लोकांसोबत जाण्याची मानसिकता सर्वणच्या लोकांची बनल्याने गावात प्रचंड खदखद सुरू आहे.
सर्वण गावात दवंडी पीटून यासंबंधी लोकांना सतर्क करण्यात आले आहे. कोमुनिदादची जमीन ज्या कुणी पैसे घेऊन परस्पर रस्त्यासाठी दिली त्यांनी गावच्या मंदिरात येऊन जबाब द्यावा, अन्यथा गावच्या मंदिरात सांगणे केले जाणार आहे, असे दवंडी पीटवून सांगण्यात आले. कारापूर-सर्वण ही एक पंचायत आहे. लोढा प्रकल्पासाठी मंजुरी देण्याच्या वेळी सर्वण गावच्या पंचसदस्य या सरपंच होत्या. गेले ३३ दिवस कारापूरवासीय या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत असताना सर्वण गाव मात्र गप्प असल्याने या गावच्या लोकांना आता अपराधीपणाची भावना सतावत आहे.
आपला गाव वाचवण्यासाठी कारापूरवासीय धडपडत आहेत आणि सर्वणवासीय मात्र याची मजा बघत आहेत, अशी परिस्थिती आहे. सर्वण गावच्या लोकांवर प्रचंड राजकीय दबाव असून त्यांची अनधिकृत घरे किंवा व्यवसाय बंद करण्याच्या धमक्या त्यांना मिळत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
कोमुनिदादच्या जमिनीतून रस्त्यासाठी वाट
नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी विक्री केलेल्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. तो रस्ता कोमुनिदादच्या जमिनीतून काढण्यात आला आहे. कोमुनिदादच्या काही घटकांना हाताशी धरून हा व्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे. सर्वण गावचे नागरिक हेच कोमुनिदादचे गावकर असल्याने आता नेमकी कुणी सही करून ही मंजुरी दिली, यावरून गावातच वातावरण बिघडले आहे.
हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांनी कुंपण घातलेल्या जमिनीत गावकऱ्यांच्या जमिनी, बागायती आहेत. या जमिनीत जाण्यासाठीच्या पारंपारिक वाटा बंद करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प हाती घेताना पारंपारिक वाटांचा विषय का हाताळला गेला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. डिचोलीचे मामलेदार तथा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी निवेदने सादर करण्यात आली असून अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
आरजीपी गोंयकारांसोबत कायम
आरजीपी पक्षात कुठलेही मतभेद किंवा वाद नाहीत. राजकीय विरोधक विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे नेते मनोज परब असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ आहे, अशी प्रतिक्रिया आमदार विरेश बोरकर यांनी दिली. आरजी पक्ष अनेकांसाठी अडचण ठरला आहे आणि त्यामुळे अफवा पसरवून या पक्षातील कार्यकर्त्यांत व समर्थकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत, असेही आमदार बोरकर म्हणाले. गोंयकारांसाठी प्राणपणाने पुढे आलेले आरजीपीचे कार्यकर्ते अजिबात मागे हटणार नाहीत. कारापूर-सर्वण गावच्या लोकांशी आरजीपी पूर्णपणे पाठीशी उभा राहणार आहे. गोव्याचा सांभाळ आणि गोव्याचे रक्षण करण्यासाठी आरजीपी प्राणांची बाजी लावून लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गोविंद शिरोडकर, अभिजित प्रभूदेसाई, रामा काणकोणकर आणि अन्य समाजकार्यकर्त्यांनी पंचायत खात्यात आलेल्या कारापूरच्या लोकांना पाठींबा दिला.
कारापूरवासियांची पंचायत खात्यात धडक
कारापूर-सर्वण ग्रामसभेत लोढा प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा ठराव मंजूर करूनही अद्याप ही नोटीस का जारी केली नाही, असा सवाल कारापूरच्या लोकांनी पंचायत संचालकांना विचारला. सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कोमुनिदादच्या जमिनीतून रस्त्यासाठी ना हरकत देण्याच्या विषयात घोटाळा झाल्याने त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी पंचायत संचालकांना दिले





