गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) : मांडवी नदीतील ऑफशोअर कॅसिनो जहाजे हटवून गोव्याची जीवनदायिनी मांडवी नदी कॅसिनोमुक्त करण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते तथा मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्याबाबत दाखल जनहित याचिकेचे मूळ याचिकादार सुदीप ताम्हणकर यांनी परमपूज्य पद्मश्री श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना सविस्तर निवेदनाव्दारे प्रार्थना केली आहे.
तपोभूमी कुंडई येथे श्री दत्त पद्मनाभ पीठ येथे आज गुरूवारी भेट देऊन त्यांनी हे निवेदन सादर केले. ताम्हणकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, म्हादई आणि मांडवी या केवळ नद्या नसून गोव्याच्या संस्कृती, पर्यावरण, श्रद्धा आणि आर्थिक जीवनाचा आधार आहेत. गोव्याच्या हजारो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणीय समतोल या नदीवर अवलंबून असल्याने मांडवीचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मांडवी नदीवरील तरंगत्या कॅसिनोंमुळे गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. एकेकाळी अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग पर्यटनासाठी ओळखला जाणारा गोवा आज जुगार, अमली पदार्थ आणि भोगवादी संस्कृतीशी जोडला जात असल्याने राज्याच्या प्रतिमेलाच धक्का बसत असल्याचे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.
मांडवी नदीवर उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांमुळे नदीचे पावित्र्य, पर्यावरणीय संतुलन आणि सांस्कृतिक महत्त्व धोक्यात आले असून नदी प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन, जलपरिसंस्थेवरील परिणाम आणि नदीच्या वहनक्षमतेबाबत विविध अभ्यास आणि अहवालांत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
त्यांनी निवेदनात असेही नमूद केले आहे की, कायद्याच्या मूळ उद्देशानुसार ऑफशोअर कॅसिनो जहाजे खोल समुद्रात कार्यरत असणे अपेक्षित असताना ती अनेक वर्षांपासून मांडवी नदीतच स्थिरावलेली आहेत. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आणि शासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“इनफ इज इनफ” या लोकचळवळीने आणि अनेक जागरूक नागरिकांनी मांडवी नदीच्या संरक्षणासाठी लोकशाही व न्यायालयीन मार्गाने संघर्ष सुरू ठेवला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल जनहित याचिकेमुळे नव्या महाकाय कॅसिनो जहाजाच्या प्रवेशाला तात्पुरता अटकाव करण्यात यश आल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, मांडवी कायमस्वरूपी कॅसिनोमुक्त करण्यासाठी व्यापक सामाजिक आणि नैतिक पाठबळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तपोभूमीने गेली अनेक दशके व्यसनमुक्ती, समाजप्रबोधन आणि संस्कार घडविण्याचे मोठे कार्य केले असून, राज्यातील राजकीय नेते, मंत्री आणि निर्णयकर्ते नियमितपणे स्वामीजींच्या दर्शनासाठी येत असल्याचे नमूद करत ताम्हणकर यांनी स्वामीजींनी या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधावे आणि मांडवी नदीचे संरक्षण तसेच कॅसिनो जहाजांचे कायद्यानुसार स्थलांतर करण्यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.




