नामस्मरण !

पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे हे गेले वर्षभर मी ठरवत होतो. पण काही ना काही निमित्त येत गेले आणि माझे जाणे ‘आवा चालली पंढरपूरा, वेशीपासूनी आली घरा’ तसे पुढे ढकलत राहीले. पंढरपूरात रहाणारे माझे स्नेही महेश आराध्ये मला म्हणाले देखील की “विठ्ठलाची इच्छा असल्याशिवाय कोण पोचतं हो पंढरपूरात. त्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा पोचाल!”
शेवटी महेशभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या आठवडय़ात अनपेक्षितपणे सर्व योग जुळून आले आणि मी पंढरपूरात जायला निघालो.
जाताना सांगोल्यात एक आजोबा एसटीत चढले. त्यांच्या पेहरावावरुन ते खेडूत शेतकरी वाटत होते. गाडीत गर्दी नसली तरी आजोबांना बसायला जागा मिळाली नाही. मी उठून आजोबांना बसायला जागा दिली. आजोबा जिव्हाळ्याचं हसले. आम्ही दोघेही पंढरपूरात उतरलो.
कुठून आलात, काय करता वगैरे चौकशी त्यांनी गाडीतच करून घेतली होते. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला मोकळे वाटत होते. आजोबांच्या गळ्यात माळ होती. यावेळेस मी माळ घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे माळ घेण्याबाबत आजोबांकडून समजून घ्यावे असे मला वाटले.
आजोबा म्हणाले, “व्यसन न करणे, मांसाहार न करणे ही काही पथ्ये पाळावी लागतात. पण महत्वाचं असतं ते हरिपाठ करणं. हरिपाठावरची श्रद्धा हे जगातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आहे. अगदी बुवाबाबांच्या नादी न लागण्यावर देखील हरिपाठावरची श्रद्धा हाच उपाय आहे. हरिपाठावर, ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांवर ज्यांची श्रद्धा नाही तेच खरातसारख्या बाबाच्या मागे लागतात.”
मला आजोबांच्या बोलण्याचे कुतूहल वाटले.
ते म्हणाले, “हरिपाठात एक अभंग आहे. हरि उच्चरणी अनंत पापराशी। जातील लयाशी क्षणमात्रे॥१ तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि॥२ हरि उच्चारण मंत्र हा अगाध। पळे भूतबाधा भेणे तेथे॥३ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा॥४ तुमचे कितीही पाप असो, फक्त ‘हरि’ उच्चारा. तुमचे पाप क्षणात भस्म होईल. ‘हरि’ उच्चारा म्हणजे भूतबित काहीही तुमच्या वाटेला येणार नाही. पण तुमची माऊलींच्या या शब्दांवर श्रद्धा नसेल तर तुम्हाला नामस्मरण करून आपले पाप जाईल, भूतबाधा वगैरे टळेल यावर विश्वास वाटणार नाही. म्हणून मग तुम्ही बाकीचे उपाय करायला जाल.
माऊलींप्रमाणेच तुकोबाराय देखील तेच सांगतात. नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची॥१ न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण॥२ ठायिच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥३ रामकृष्णहरि विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ॥४ यावीण आणिक असता पै साधन। वाहतसे आण विठोबाची॥५ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनि। शहाणा तो धणी घेतो येथे॥६ समजले का? कळायला सोपा अभंग आहे. तुकोबाराय विठ्ठलाची शपथ घेऊन सांगताहेत. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. वनात जावे लागत नाही, काही सायास करावे लागत नाहीत. विठ्ठल स्वतः येतो. तुमचा या शब्दांवर विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तरच तुम्ही बुवाबाबाकडे जाणार. आणि तो बाबा सांगतो ते उद्योग करत बसणार. तुम्ही संतांवर श्रद्धा ठेवा, तुमची सगळी अंधश्रद्धा जाते बघा.’ आजोबांना ऐकताना मला भारावल्यासारखे झाले. मी पाया पडायला वाकलो. आजोबाही वाकले. नामस्मरणाचे महत्त्व माझ्या मनावर ठसवायलाच जणू त्या आजोबांना विठ्ठलाने मला भेटवले असे वाटून डोळे पाणावले.

डाॅ.रुपेश पाटकर

  • Related Posts

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    *_सत्तेत आज आहात, मग रोजगारासाठी २०२७ पर्यंत थांबायचे कशाला?_* राष्ट्रध्वजाच्या भावनिक मुद्द्याआड बेरोजगारीचा प्रश्न दडपण्याचा प्रयत्न : विश्वासराव राणे वाळपई, दि.१६: गोव्यातील बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्यांची वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात…

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    गोवा विद्यापीठाच्या परिषद सभागृहाच्या भिंतीवर आतापर्यंत कुलगुरू पद भूषविलेल्या नऊ व्यक्तींची छायाचित्रे लावलेली आहेत. ३ सप्टेंबर २०२६ पासून दहाव्या कुलगुरूंचे छायाचित्र तिथे लावले जाईल. आता ते कुणाचे असेल, याबाबत साऱ्यांना…

    You Missed

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    विकसित भारत : समृद्ध गोवा

    विकसित भारत : समृद्ध गोवा