गोव्यासारख्या राज्यासाठी रोजगार धोरण तयार करताना स्थानिक संस्कृती, धार्मिक परंपरा, गावांची सामाजिक रचना आणि लोकजीवन यांचा अभ्यास आवश्यक आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय युवकांना दिलेला सल्ला प्रथमदर्शनी चुकीचा वाटत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक तरुणाने आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेणे, कौशल्य विकसित करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. परंतु या विषयाचा विचार करताना केवळ “जत्रा, कालो आणि सण-उत्सवांमध्ये युवक अडकून पडतात” एवढ्यापुरता विचार करून चालणार नाही. हा प्रश्न दिसतो त्यापेक्षा खूप खोल आणि गुंतागुंतीचा आहे.
गोव्याचा समाज हा भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. येथे केवळ भौगोलिक गाव नाहीत, तर प्रत्येक गावाची स्वतःची एक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक रचना आहे. प्रत्येक गावाचे ग्रामदैवत आहे, प्रत्येक समाजाचे कुलदैवत आहे आणि या दोन्हींच्या भोवती शेकडो वर्षांची परंपरा उभी आहे. या परंपरेत प्रत्येक समाजघटकाची विशिष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.
देवस्थानचे महाजन, कुळावी, सेवेकरी, वादक, ध्वजवाहक, पालखी वाहणारे, धार्मिक विधी पार पाडणारे अशा अनेक भूमिका पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. या जबाबदाऱ्या कोणत्याही सरकारी आदेशाने निर्माण झालेल्या नाहीत; त्या समाजाने स्वतः स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे त्या पार पाडणे ही केवळ श्रद्धा नसून सामाजिक बांधिलकी असते.
उदाहरणार्थ, शिरगावच्या प्रसिद्ध जत्रेतील धोंडव्रत ही केवळ धार्मिक कृती नाही. त्यामागे शतकानुशतके चालत आलेली परंपरा, श्रद्धा आणि समाजव्यवस्था आहे. अशा प्रकारचे अनेक विधी गोव्यातील जवळपास प्रत्येक गावात आहेत. त्यामुळे या काळात संबंधित व्यक्तींना उपस्थित राहणे अपरिहार्य ठरते.
सरकारी नोकरीत अनेकदा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन रजा मिळते. मात्र खासगी क्षेत्रात, विशेषतः उत्पादन, पर्यटन, सेवा आणि औद्योगिक क्षेत्रात, सातत्यपूर्ण उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची असते. वारंवार रजा घेणे उद्योगांना परवडत नाही. परिणामी अनेक युवक अशा नोकऱ्यांमध्ये टिकत नाहीत किंवा त्यांना त्या स्वीकारणे कठीण जाते. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून युवकांवरच दोषारोप करणे योग्य ठरणार नाही.
याचा अर्थ असा अजिबात नाही की गोमंतकीय युवकांना करिअरमध्ये रस नाही. उलट मोठ्या प्रमाणात युवक आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. आयटी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, नौकानयन, पर्यटन आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे संपूर्ण पिढीवर “सण-उत्सवांमध्ये रमणारी” असा शिक्का मारणे अन्यायकारक ठरेल.
याचबरोबर दुसरा एक गंभीर मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षांनी पारंपरिक सण-उत्सवांना स्पर्धात्मक स्वरूप दिले आहे. पूर्वी गावापुरते मर्यादित असलेले फुगडी, धालो, भजन, घुमट आरती, कालो, सांस्कृतिक महोत्सव आणि इतर लोकपरंपरा आता राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनल्या आहेत.
स्पर्धा, बक्षिसे, मोठे मंच, प्रसिद्धी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे या कार्यक्रमांचे स्वरूप बदलले आहे. ज्या कला मूळतः धार्मिक किंवा सांस्कृतिक विधींचा भाग होत्या त्या आता वर्षभर स्पर्धांमध्ये सादर केल्या जात आहेत. ही परंपरा जपण्याची प्रक्रिया आहे की तिचे व्यापारीकरण, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
गावागावात होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचेही असेच चित्र आहे. खेळाला प्रोत्साहन मिळणे आवश्यक असले तरी या स्पर्धांमधून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू किती घडले, हा प्रश्न आहे. मात्र या स्पर्धांच्या आयोजनात आणि सहभागात अनेक तरुण वर्षानुवर्षे गुंतून राहतात. त्यामुळे शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअर यांकडे अनेकदा दुय्यमपणे पाहिले जाते.
त्याचप्रमाणे पारंपरिक सणांव्यतिरिक्त विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक महोत्सवांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. अनेक कार्यक्रम हे सामाजिक गरजेपेक्षा राजकीय उपस्थिती दाखविण्यासाठी आयोजित केले जात असल्याची टीकाही होत असते. महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांना अशा कार्यक्रमांत गुंतवून ठेवण्याचे एक वेगळे अर्थकारण तयार झाले आहे.
म्हणूनच प्रश्न फक्त युवकांचा नाही. प्रश्न शासनाच्या रोजगार धोरणाचाही आहे.
गोव्यासारख्या राज्यासाठी रोजगार धोरण तयार करताना स्थानिक संस्कृती, धार्मिक परंपरा, गावांची सामाजिक रचना आणि लोकजीवन यांचा अभ्यास आवश्यक आहे. मुंबई, पुणे किंवा बंगळुरूतील कॉर्पोरेट संस्कृती जशीच्या तशी गोव्यावर लादणे हे दीर्घकालीन दृष्टीने योग्य ठरेलच असे नाही.
सरकारने खाजगी उद्योगांशी चर्चा करून स्थानिक परंपरांचा आदर करणारी रजा धोरणे, लवचिक कामकाज, शिफ्ट पद्धती, उत्सवांच्या काळातील नियोजन अशा पर्यायांवर विचार करण्याची गरज आहे. उद्योगांनाही स्थानिक सामाजिक वास्तव समजून घेण्याची जबाबदारी आहे.
त्याचवेळी युवकांनीही बदलत्या काळाची गरज ओळखली पाहिजे. करिअर आणि संस्कृती यांपैकी एकाची निवड करण्याची वेळ येऊ नये. आधुनिक कौशल्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन यांच्यासोबत आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणे शक्य आहे, यावर विश्वास ठेवला पाहिजे.
गोव्याची खरी ओळख केवळ समुद्रकिनारे किंवा पर्यटन नाही. ती गावपणात, देवस्थानांच्या परंपरेत, लोककलांमध्ये आणि सामुदायिक जीवनात आहे. ही ओळख टिकवून ठेवत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हेच सुजाण शासनाचे लक्षण ठरेल.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा त्यामुळे स्वागतार्ह आहे. मात्र या चर्चेचा निष्कर्ष युवकांवर दोषारोप करण्यात नसून, गोव्याच्या सामाजिक वास्तवाचा सखोल अभ्यास करून रोजगार आणि संस्कृती यांचा समतोल साधणारे धोरण तयार करण्यात असला पाहिजे. अन्यथा रोजगार मिळेल; पण त्याची किंमत म्हणून गोमंतकीय जीवनपद्धती आणि गोंयकारपणाची ओळख हळूहळू पुसली जाण्याचा धोका नाकारता येणार नाही.







