युवा नेते प्रभव नायक यांची टीका
गांवकारी,दि.९(प्रतिनिधी)
मडगांवचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी मडगावसाठी जाहीर केलेला मास्टर प्लॅन २०४१ कुठे गेला, असा सवाल मडगांवचो आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे. विकासासाठी पक्षांतर केल्याचा दावा केलेले दिगंबर कामत हे खरोखरच मडगांवचा विचार करून भाजपात गेले आहेत की संपत्ती जमविण्यासाठी असा खडा सवालही त्यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडील केलेल्या एका वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना बाजाराभोवती ड्रेनेज प्लॅनसाठी सल्लागार नेमण्याच्या निर्णयावर नायक यांनी टीका केली. एप्रिल २०२६ मध्येच बाजाराभोवती टिनचे शेड्स उभारले जात असताना योग्य ड्रेनेज व विजेचे नियोजन न करता काम सुरू झाल्याची त्यांनी दखल घेतली होती. सल्लागार नेमून तुकड्या-तुकड्यांत कामे करणे म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि निकृष्ट नियोजनाचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.
जुन्या मासळी बाजारात हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्प, जुन्या बसस्थानकावर फूड कोर्ट, तसेच मडगाव नगरपालिका बागेत दोन मजली इमारत उभारण्याचे निर्णय हे शहराच्या विकासासाठी कोणतेही व्यापक दृष्टिकोन नसल्याचे स्पष्ट करतात, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच आमदार मास्टर प्लॅन २०४१ पुढे रेटत होते आणि तोच शहराच्या विकासाचा आराखडा ठरेल, असे सांगत होते. आज मात्र मास्टर प्लॅनवर पूर्ण शांतता असून एकामागून एक प्रकल्प जाहीर केले जात आहेत. “मास्टर प्लॅन २०४१ गटारात टाकला आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“जर मास्टर प्लॅन मडगावच्या भविष्यासाठी होता, तर त्याची स्थिती न सांगता मोठे प्रकल्प का घेतले जात आहेत? मास्टर प्लॅन आता अप्रासंगिक झाला आहे का, की मनमानी निर्णय घेण्याच्या आड येत असल्याने तो सोयीस्करपणे बाजूला सारला आहे?” असा सवाल नायक यांनी केला.
आमदार दिगंबर कामत आणि मडगांव पालिकेने मास्टर प्लॅन २०४१ ची सद्यस्थिती तातडीने सार्वजनिक करावी. त्यात खर्चाचे तपशील, सल्लागारांचे मानधन, प्राप्त झालेल्या हरकती, तसेच सुरू असलेले प्रकल्प मास्टर प्लॅनशी सुसंगत आहेत का, याची माहिती द्यावी. “मडगावला नियोजित विकास हवा आहे, राजकीय सोयीसाठी घेतलेले अनियमित प्रकल्प नव्हेत,” असे प्रभव नायक म्हणाले.





