अॅड. अर्चित नाईक युवाध्यक्षपदी शपथबद्ध
गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)
राज्यातील भ्रष्ट सत्ताधारी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी युवा काँग्रेस सज्ज असल्याचा इशारा नवनिर्वाचित प्रदेश युवा अध्यक्ष अॅड. अर्चित नाईक यांनी दिला. विधानसभेत किमान २० टक्के उमेदवारी युवकांना मिळवण्याबरोबरच किमान शंभर युवकांची एक भक्कम फळी सरकारला शिंगावर घेण्यासाठी तैनात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गोवा प्रदेश युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अॅड. अर्चित नाईक यांची निवड झाल्यानंतर आज एका भव्य सोहळ्यात युवा काँग्रेस कार्यकारिणीला शपथ देण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, राष्ट्रीय युवा काँग्रेसचे उदय भानू चिब, युवा काँग्रेस प्रभारी मनिष शर्मा, केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
युवकांना हवा रोजगार
राज्यातील भाजप सरकारने सरकारी नोकऱ्यांचा बाजार मांडला आहे. या बाजारात हजारो युवकांच्या भवितव्याचा लिलाव केला जात आहे. पारदर्शक नोकरभरतीच्या नावाखाली आपल्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना नोकऱ्यांचे वाटप केले जात आहे. युवकांना केवळ पोकळ आश्वासने नकोत, तर रोजगार हवा आहे. युवकांच्या अनेक विषयांना या सरकारकडून अजिबात न्याय मिळत नाही. युवा काँग्रेस यापुढे युवकांचे वेगवेगळे विषय घेऊन रस्त्यावर उतरून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही अर्चित नाईक यांनी सांगितले. विद्यार्थी आणि युवा हा देशाचे भवितव्य असल्यामुळे त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युवा ठरवणार गोव्याचे भवितव्य
राज्यातील ३० ते ४० टक्के मतदार हा युवक आहे. हाच मतदार गोव्याचे भवितव्य ठरवणार आहे. आज दुर्दैवाने या युवकांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरू आहे. सरकारी नोकऱ्या विकल्या जात आहेत. विविध विषयांवर चर्चा करण्याची तयारीच या सरकारची नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांनी गोव्याचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार नेहमीच गोमंतकीयांना दिला; पण हल्ली दिल्लीवाल्यांकडूनच गोव्याचा कारभार हाकला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
आंदोलकांना घेतले ताब्यात
गोवा प्रदेश युवा काँग्रेसतर्फे आज युवकांवरील अन्यायाविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.








