पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांची सतावणूक
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
समाजमाध्यमांवर विविध विषयांवरील चर्चा किंवा अन्य पोस्टमध्ये भाजप किंवा भाजप नेत्यांविरोधात अपशब्द किंवा अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात धार्मिक किंवा वैयक्तिक भावना दुखावल्याच्या तक्रारींचा सपाटा भारतीय जनता युवा मोर्चाने चालवला आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांची उघडपणे सतावणूक सुरू असून, त्यांना चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलिस स्थानकांवर तासनतास बसवून ठेवले जात असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सुर्ला गावचे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी उदय नाटेकर यांना म्हापसा, पेडणे आणि काणकोण पोलिस स्थानकांवर चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी सुर्ला गावच्या एका सोशल मीडिया ग्रुपवर सरकारबाबत नाराजी व्यक्त करणारा पोस्ट टाकला होता. सध्या सुर्ला गावातील खनिज डंपविषयी मोठा असंतोष आहे. या चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते म्हणून उदय नाटेकर यांची सतावणूक सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, उदय नाटेकर हे भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे भाजयुमोचे विविध पदाधिकारी आहेत. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांवर अशा तक्रारी दाखल करून पोलिस निरीक्षकांमार्फत विरोधी व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण करून मानसिक छळवणूक करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यापूर्वी स्वप्नेश शेर्लेकर, गोविंद शिरोडकर यांच्याविरोधातही अशाच तक्रारी दाखल करून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
ही लोकशाही की सालाझारशाही?
पोर्तुगीज काळात तत्कालीन सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात होती. आज आपण लोकशाहीत जगतो. इथे आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार संविधानाने दिला आहे. सरकारचे चुकीचे निर्णय किंवा धोरणांविरोधात असमाधानी असणे यात काहीच चुकीचे नाही. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पुढे करून खोट्या तक्रारी दाखल करून सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांचा धाक दाखवण्याचा सपाटा सुरू आहे. पोलिस देखील या बेकायदा आदेशांना अनुसरून कार्यवाही करत असल्याचे दिसून येते.






