मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याने पक्षात चैतन्य; युती, तरुणांना प्रतिनिधित्व आणि उमेदवारीवर चर्चा
गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी)
आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याने पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी त्याचवेळी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे सूरही स्पष्टपणे उमटले. ‘एकजुटीने लढू आणि एकजुटीने जिंकू’ असा संदेश देत खर्गे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
गोवा दौऱ्यावर असलेल्या खर्गे यांनी रविवारी आयोजित ‘एकवट’ सभेला संबोधित केल्यानंतर सोमवारी पक्षातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. गोव्यातील बैठकीला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे सांगत, मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातील सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचा संदेश खर्गे यांनी दिला. निवडणूक जिंकण्यासाठी संघटनात्मक एकजूट अत्यंत महत्त्वाची असून काँग्रेसचे नेते एकत्रितपणे लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युतीचा निर्णय आधी गोव्यात, नंतर हायकमांडकडे
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये संभाव्य युतीबाबत खर्गे यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. युतीसंदर्भातील प्राथमिक निर्णय गोव्यातील प्रदेश नेतृत्वाने घ्यावा. राज्य पातळीवर चर्चा करून तयार केलेला प्रस्ताव त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘जेन झी’ला प्रतिनिधित्व देण्याचे संकेत
तरुणांना, विशेषतः ‘जेन झी’ पिढीला राजकीय प्रतिनिधित्व आणि निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबतही खर्गे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तरुण पिढीला राजकीय संधी देण्याबाबत काँग्रेसने केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
सरकारवर खर्गेंची टीका
राज्यातील सरकार लोकांना घाबरवण्याचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत सरकारने विरोधकांशी शत्रुत्वाची भूमिका न घेता प्रशासनाचे नियम पाळून कारभार सुधारण्यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी म्हटले.
अमित पाटकरांची उघड नाराजी
खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीवरून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीही समोर आली. या बैठकीसाठी आपल्याला कोणतेही निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित पाटकर यांनी केला.
मात्र, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पाटकर यांचा दावा फेटाळून लावला. एम. के. शेख यांनी पाटकर यांना फोन करून तसेच संदेश पाठवून बैठकीची माहिती दिली होती, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
‘पक्षांतर केलेल्या १९ जणांना पुन्हा तिकीट नको’
दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारांचा मुद्दाही खर्गे यांच्या भेटीदरम्यान उपस्थित करण्यात आला. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या १९ माजी आमदारांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी ‘गोवा प्रथम’ या चळवळीच्या वतीने खर्गे यांच्यासमोर करण्यात आली.
तसेच, आगामी निवडणुकीची तयारी अधिक वेगाने करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत शक्य तितक्या विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करावी, अशी मागणीही करण्यात आली.






