इतका निर्दयीपणा कशासाठी ?

सरकार आणि प्रशासन फक्त कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. आक्रोश करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या विषयांना अदखलपात्र ठरवले जाते. लोकांमध्ये दुर्लक्षितपणाची भावना वाढत आहे.

शेजारील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात वाट चुकलेला ओंकार नावाचा हत्ती सध्या लोकांची झोप उडवत आहे. आपल्या कळपातून भरकटलेला हा हत्ती मागील काही महिन्यांपासून सतत भटकंती करत आहे. तो कुठे पोहोचतो आहे हे त्यालाच ठाऊक नाही. यापूर्वी तो पेडणेतील मोपा, तोरसे, तांबोसे या गावांत आला होता आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. नंतर तो पुन्हा दोडामार्ग तालुक्यात गेला. आता पुन्हा त्याची रवानगी पेडणेत झाली आहे.
हा हत्ती शेतकऱ्यांचे नुकसान तर करतोच, पण स्थानिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. इतके असूनही सरकारची बेपर्वाई पाहिली तर प्रशासनाला त्याचे काहीच पडलेले नाही असे दिसते. वन खात्याचे एक वाहन आणि काही कर्मचारी केवळ त्याच्यावर पाळत ठेवतात. हातात मशाली, फटाके किंवा पारंपरिक उपायांनी त्याला परतवून लावण्याचा प्रयत्न ते करतात, पण त्यांच्या हातात ठोस उपाय नाही.
एक जंगली प्राणी अशा प्रकारे लोकवस्तीत आला आहे तर त्याला आटोक्यात आणण्याची किंवा पकडून पुनर्वसन करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही हे नेमके काय दर्शवते? अशा घटना क्वचितच घडतात, पण तरीही इतर राज्यांकडून माहुत किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ मागवून या हत्तीला पकडून योग्य ठिकाणी सोडण्याची व्यवस्था व्हायला हवी. गोवा सोडा, पण महाराष्ट्र सरकारकडेही यासाठी उपाययोजना नसणे ही खरोखरच शरमेची बाब आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच चर्चेत असतो, पण हत्तीच्या विषयावरून राणे पुढाकार घेत नाहीत. गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे हे उत्कृष्ट नेचर फोटोग्राफर आहेत. जगभरातील जंगलांत ते फोटोग्राफीसाठी भटकंती करतात. जंगली प्राण्यांची त्यांना आवड आहे, पण ओंकार हत्तीच्या विषयाकडे त्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होतो.
पेडणे तालुक्यातील एक आमदार फक्त स्पर्धा आणि इव्हेंटमध्ये मश्गुल आहेत, तर दुसरे नारळ फोडण्यात गर्क आहेत. हत्तीच्या व्यवस्थेबाबत मागणी करण्याची त्यांची तयारी नसते, पण नुकसान झाल्यावर भरपाई देण्यासाठी मात्र ते पुढे असतात. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि विशेषतः पेडणेकरांना कुणीच वाली नाही की काय, असा प्रश्न पडतो.
वास्तविक सरकार किंवा प्रशासनाचे लक्ष वंचित, दुर्लक्षित, पीडित आणि अन्यायग्रस्तांकडे असणे अपेक्षित आहे. मात्र भाजपच्या राजवटीत वेगळेच सुरू आहे. लोकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सरकार आणि प्रशासन फक्त कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. आक्रोश करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या विषयांना अदखलपात्र ठरवले जाते. लोकांमध्ये दुर्लक्षितपणाची भावना वाढत आहे.
राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. शेतकऱ्यांची नुकसानी भरपाईतून भरून येत नाही. एखादा माड वाढवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे शेतकऱ्यालाच ठाऊक असते. ही भविष्याची तरतूद असते आणि ते भविष्य पैशांच्या नोटांनी उभे करता येत नाही. सरकारची ही बेफिकीरी आणि बेपर्वाई निर्दयीपणाचेच दर्शन घडवते, असे खेदाने म्हणावे लागते.

  • Related Posts

    कारापूर आंदोलनाची बदनामी नको

    कारापूरला बदनाम करण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरे द्या. आंदोलन दडपण्यापेक्षा आरोपांची निष्पक्ष चौकशी करा. आणि लोकांच्या आवाजाला पोलिसी ताकदीने नव्हे, तर संवादाने उत्तर द्या. दीडशे दिवसांचा कारापूरचा लढा आज हाच सवाल सत्तेला…

    शांत गोव्याला बंदुकीची सलामी ?

    विशेषतः मोठ्या आर्थिक उलाढालीच्या व्यवसायात पैशांच्या वादातून हिंसक मार्गाचा अवलंब होऊ लागला, तर त्याचा परिणाम गोव्याच्या गुंतवणूक आणि पर्यटन प्रतिमेवरही होऊ शकतो. गोवा म्हणजे शांतता, पर्यटन आणि सुरक्षिततेची ओळख. मात्र,…

    You Missed

    31/08/2026 e-paper

    31/08/2026 e-paper

    कारापूर आंदोलनाची बदनामी नको

    कारापूर आंदोलनाची बदनामी नको

    विधानसभा अधिवेशनाला वादळी सुरुवात

    विधानसभा अधिवेशनाला वादळी सुरुवात

    BJP Has Pushed Goa from ICU to CCU, Says Yuri Alemao on Day One of Assembly Session

    BJP Has Pushed Goa from ICU to CCU, Says Yuri Alemao on Day One of Assembly Session

    तोरसेत राजन कोरगावकरांना जोरदार पाठिंबा; ‘भूमिपुत्राला विधानसभेत पाठवू’ असा निर्धार

    तोरसेत राजन कोरगावकरांना जोरदार पाठिंबा; ‘भूमिपुत्राला विधानसभेत पाठवू’ असा निर्धार

    Cancel Porvorim Flyover Inaugural Event, Prabhav Naik Urges Gadkari in Letter

    Cancel Porvorim Flyover Inaugural Event, Prabhav Naik Urges Gadkari in Letter