गोवा मुक्तीवेळी पाहिलेली स्वप्ने अपूर्णच

गोवा मुक्त झाला का, की फक्त सत्तेचा मालक बदलला? हा प्रश्न कटू आहे, पण आवश्यक आहे. पोर्तुगीज गेले, पण अनियंत्रित भांडवलशाही आली. विदेशी सत्ता गेली, पण आतील शोषण वाढले.

१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाला. त्या क्षणी गोव्याच्या जनतेने केवळ राजकीय स्वातंत्र्याचे नव्हे, तर स्वाभिमान, सांस्कृतिक जतन, निसर्गसंरक्षण आणि संतुलित विकासाचे स्वप्न पाहिले होते. आज, ६० हून अधिक वर्षांनंतर मागे वळून पाहताना एक प्रश्न अस्वस्थ करतो, ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरली का?
स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे फक्त सत्ता बदल नव्हता. गोवा मुक्ती म्हणजे केवळ झेंडा बदलणे नव्हते. अपेक्षा होती गोव्याच्या निसर्गसंपत्तीचे रक्षण, मराठी-कोंकणी भाषा व स्थानिक संस्कृतीचे जतन, छोट्या भूमीवर नियंत्रित, शाश्वत विकास. बाहेरून येणाऱ्या शक्तींमुळे स्थानिक माणूस दुय्यम ठरू नये, असे वाटत होते. पण आजची परिस्थिती पाहिली, तर या स्वप्नांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.
निसर्ग ही गोव्याची ओळख, पण तोच सर्वाधिक उपेक्षित राहिला आहे. कधी काळी हिरवीगार डोंगररांग, नद्यांची स्वच्छ पात्रे, नारळ, भातशेती, काजूची वने, मोकळे समुद्रकिनारे असायचे. आज मात्र डोंगर पोखरले गेले, नद्या सांडपाण्याचे नाले बनल्या, भातशेतीच्या जमिनीत रिसॉर्ट्स व बंगले उभे राहिले.
समुद्रकिनाऱ्यावर अनियंत्रित बांधकाम दिसते आहे. पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाचे व्यापारीकरण झाले. “विकास” हा शब्द इतका वापरला गेला की निसर्गसंरक्षण हा अडथळा मानला जाऊ लागला. काँक्रिट जंगल म्हणजे विकास की विनाश, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोव्यात आज विकास म्हणजे उंच इमारती, महामार्ग विस्तार, स्मार्ट सिटी प्रकल्प, आलिशान हॉटेल्स, क्लब, कॅसिनो, स्पा, पण प्रश्न असा आहे की हा विकास कोणासाठी?
स्थानिक तरुणांसाठी दर्जेदार रोजगार वाढला का? गोमंतकीयाला घर परवडणारे राहिले का? खेडी आत्मनिर्भर बनली का? उत्तर अनेकदा नकारार्थीच आहे. गोवा आज बांधकाम लॉबी आणि बाहेरच्या भांडवलासाठी खुली बाजारपेठ बनत चालला आहे.
संस्कृती आणि ओळख हळूहळू पुसट होत चालली आहे. मुक्तीवेळी गोमंतकीय माणूस आपल्या भाषेवर, परंपरेवर, सण-उत्सवांवर अभिमान बाळगत होता. आज मराठी व कोंकणी दुय्यम ठरत आहेत. स्वच्छंद संस्कृती लादली जाते आहे. नाईटलाइफच्या नावाखाली सामाजिक अधःपतन वाढते आहे.
गोवा “जगासाठी मनोरंजनाचे ठिकाण” बनताना गोमंतकीयांसाठी राहण्याजोगा प्रदेश राहतो आहे का, हा प्रश्न गंभीर आहे.
प्रशासन आणि राजकारणाचा विचार करता स्वप्नांची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न पडतो. मुक्तीनंतर सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने गोव्याच्या हिताची शपथ घेतली. पण नियोजनाचा अभाव दिसला. भ्रष्टाचार वाढला. बिल्डर-राजकारणी साटेलोटे दिसत आहेत. लोकविरोधी धोरणांमुळे मुक्तीवेळी पाहिलेली स्वप्ने हळूहळू फाईलमध्ये बंद झाली.
मग गोवा मुक्त झाला का, की फक्त सत्तेचा मालक बदलला? हा प्रश्न कटू आहे, पण आवश्यक आहे. पोर्तुगीज गेले, पण अनियंत्रित भांडवलशाही आली. विदेशी सत्ता गेली, पण आतील शोषण वाढले.
तसे पाहिले तर अजूनही वेळ गेलेली नाही. गोवा वाचवायचा असेल तर निसर्गाला केंद्रस्थानी ठेवणारा विकास व्हायला हवा. स्थानिकांना प्राधान्य देणारी धोरणे हवीत. मराठी-कोंकणी, संस्कृती, गावपण जपणारी दिशा द्यावी लागेल. पर्यटनाचा दर्जा वाढवून संख्या मर्यादित ठेवावी लागेल.
आजची स्थिती पाहता, गोवा मुक्तीवेळी पाहिलेली अनेक स्वप्ने अर्धवटच राहिली आहेत. निसर्ग नष्ट होत असताना, काँक्रिट जंगल वाढत असताना, हा प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे—आपण गोव्याला विकसित करत आहोत की संपवत आहोत?
हा प्रश्न राजकारण्यांचा नाही, तर प्रत्येक गोमंतकीयाचा आहे.

  • Related Posts

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    आज गरज आहे ती भीती झटकण्याची, स्वार्थ बाजूला ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मार्गाने संघटित होण्याची. तरुणाई ही कोणत्याही समाजाची ऊर्जा असते. समाजाचे वर्तमान आणि भविष्य यांच्यामधील सर्वांत मजबूत पूल…

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    You Missed

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Goan Talent Shines Nationally

    Goan Talent Shines Nationally

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Democracy Dies When Citizens Fear to Speak

    Democracy Dies When Citizens Fear to Speak