स्वप्नेश शेर्लेकर यांचा दामू नाईक यांना सल्ला
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी काँग्रेसने पेरलेली बीजे कारणीभूत आहेत, हा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा युक्तिवाद म्हणजे जनतेला मूर्ख ठरविण्याचा खटाटोप आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना मूर्ख बनवले आहेच, परंतु जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोलाही शेर्लेकर यांनी लगावला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार स्वप्नेश शेर्लेकर यांनी घेतला. काँग्रेस पक्षाच्या आमदारांची घाऊक पद्धतीने खरेदी भाजपने केली आहे. यापूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेसह दोन तृतीयांश आमदार दोन वेळा भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसची बीजे भाजपने खरेदी केल्यानंतर ती उगवली, तर त्याला काँग्रेस कसा काय जबाबदार, असा प्रतिसवाल स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला.
वास्तविक, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि सदानंद शेट तानावडे यांच्या कार्यकाळात काँग्रेसच्या आमदारांची आयात करण्यात आली होती. दामू नाईक यांचा रोख या पूर्व प्रदेशाध्यक्षांवर असण्याची गरज होती, परंतु ते काँग्रेसवर दोषारोप करून स्वतःचे हसे करून घेत आहेत, अशी टीकाही शेर्लेकर यांनी केली.
विश्वजीतांकडून स्पष्टीकरण घ्या
राज्यात जमिनी स्थानिक लोकांकडूनच विकल्या जातात, मग याला पक्ष किंवा सरकार कसा काय जबाबदार, असा सवालही दामू नाईक यांनी केला होता. दामू नाईक हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असले तरी नव्या भाजपची धुरा त्यांच्या खांद्यावर आल्याने ते अनेक गोष्टींबाबत अनभिज्ञ असावेत, असे शेर्लेकर म्हणाले.
सत्तरीचे मोकासदार आणि जमीनदार विश्वजीत राणे यांनी कारापूर-साखळीतील सुमारे साडेपाच लाख चौ. मीटर जमीन का विकावी लागली, याचे स्पष्टीकरण त्यांनी विश्वजीत राणे यांच्याकडून घ्यावे, असा सल्ला स्वप्नेश शेर्लेकर यांनी दिला. या भूखंडांवर सुमारे एक हजार लहान भूखंड तयार करण्यात आले. यापैकी एकही भूखंड गोमंतकीयांनी विकत घेतलेला नाही, कारण तो त्यांना परवडत नाही.
दामू नाईक यांनी प्रथम नवीन भाजपचा सखोल अभ्यास करावा आणि नंतरच मुक्ताफळे उधळावीत, असा टोलाही शेर्लेकर यांनी लगावला.







