काँग्रेस, आपसह सामाजिक संघटनांचा पाठींबा
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
कारापूर येथे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कारापूरवासियांनी थेट दिल्लीतील जंतरमंतरवर धडक दिली. राज्य सरकारने आंदोलकांकडे कानाडोळा केला असला तरी केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन हा महाकाय प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कारापूरवासीयांनी जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. कारापूर गावांवर संकट म्हणून हा प्रकल्प उभा राहणार असल्याने अशा महाकाय प्रकल्पांची गोव्याला गरज नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांची जमीन विक्री आणि त्याच खात्याकडून मिळालेले परवाने यांची वैधता प्रश्नांकित असल्याने याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. स्वप्नील सालेलकर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, अॅड. अजय प्रभूगांवकर, गौरीश घाडी तसेच महिलावर्गानेही आंदोलनात सहभाग घेतला.
काँग्रेस, आपचा पाठींबा
काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर आणि खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कारापूरवासीयांना पाठींबा दर्शवला. गोव्यातील भाजप सरकार आंधळे बनले आहे. गोव्यातून भाजपची विजय यात्रा सुरू झाली होती, मात्र आता गोव्यातूनच भाजपच्या पराभवाचा शुभारंभ होणार आहे, असा टोला कवठणकर यांनी हाणला. खासदार फर्नांडिस यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका करताना, रिअल इस्टेट उद्योजकांना गोव्यात लाल गलीचा पांघरण्यात आला असून गोव्याची स्वतंत्र ओळख, अस्मिता, भाषा आणि वेगळेपण मिटवण्याचा विडाच भाजपने उचलला आहे, असे म्हटले. आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन कारापूरवासीयांना पाठींबा दिला.
सामाजिक कार्यकर्तेही दिल्लीत धडकले
विविध सामाजिक संघटना आणि गोंयचे राखणदार आदी संघटनांचे नेते दिल्लीत कारापूरवासीयांच्या पाठींब्यासाठी दाखल झाले. रामा काणकोणकर, विल्बर टीकलो आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कारापूरवासीयांच्या जिद्धीचे कौतुक केले.
पणजी आझाद मैदानावर एकत्र येणार
कारापूर आंदोलनाच्या शंभर दिवसांच्या निमित्ताने इनफ इज इनफ, गोवा तर्फे गोमंतकीयांना पणजी येथील आझाद मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारापूरवासीयांचा हा लढा त्यांच्या गावाचे रक्षण करण्यासाठी आहे. या लोकांची चिकाटी आणि जिद्ध खरोखरच कौतुकास्पद असून दिल्लीत गेलेल्या आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच जागृत गोमंतकीयांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





