सावंतवाडीच्या फातर्पेकर बाईंच्या घरी मी अनेकदा जातो. सरांना आणि बाईंना भेटायला मला आनंद वाटतो. त्यांच्याकडे ‘मीरा’ नावाची काळीसावळी, बारीकशी, सगळे केस पांढरेशुभ्र झालेली बाई काम करत असे. सर व बाई नसताना कधी मी त्यांच्या घरी गेलो तर ‘कोण नाय आसत’ असे ती सांगे. एवढेच तीन शब्द मी तिच्या तोंडून ऐकले होते. मला ती सायकाॅटीक वाटे.
तीनचार वर्षांपूर्वी बोलण्याच्या ओघात बाई म्हणाल्या, “आमची मीरा वारली.”
“ती वेडसर बाई होती, ती का?” मी सहज विचारले.
बाई म्हणाल्या, “वेडसर नको रे म्हणू तिला.”
त्यानंतर बाईंनी तिचा एक किस्सा सांगितला. सुमारे दहा वर्षांपूर्वी बाईंचे गुडघ्यांचे ऑपरेशन झाले होते. त्या हाॅस्पिटलमधून परत आल्यावर मीरा त्यांच्या अंथरुणाजवळ बसली. ड्रेसिंग केलेले गुडघे बघून ती म्हणाली, “पुढचे दोन महिने माका पगार देव नकात.”
बाईंनी विचारले, “कित्याक गो?”
त्यावर ती म्हणाली, “तुमका आपरेशनासाठी खूप खर्च इलो असतलो. तेतूर आणि माझो खर्च कित्याक!”
हा प्रसंग सांगून बाईंनी विचारले, “अशा बाईला तू वेडसर म्हणशील काय?”
मीराची ही गोष्ट ऐकून मला खूप अपराधी वाटलं. मनाने विशाल असलेल्या मीराला वेडसर म्हणून मी सहज तिचा अपमान करुन गेलो होतो. मला हे मान्य करायला हवे की माझे मन अजुनही मीराइतके विशाल झालेले नाही. ते तिच्याइतके विशाल होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच माझ्या अपराधबोधावर उपाय आहे!
– डाॅ.रुपेश पाटकर





