मुक्तीनंतर गोवा सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपण ती जबाबदारी न पेलता स्वातंत्र्यसैनिकांच्या नावानेच रडत बसलो, तर आमच्यासारखी निर्लज्ज पिढी दुसरी नाही.
गोव्याचे एक आघाडीचे कृषितज्ज्ञ, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि शेती, बागायती, फलोत्पादन याबाबत राज्यभरात मोठी जनजागृती केलेले मिंगेल ब्रागांझा यांची एक वेगळी ओळख आहे. कृषी विद्यालयासाठी त्यांनी पुढाकार घेऊन युवकांपुढे कृषी व्यवसायाचा आदर्श घालून देण्यासाठीही काम केले. सर्वसामान्य गोंयकार शेतकरी व बागायतदारांना शास्त्रोक्त माहिती देण्यात तसेच गोव्यात कोकण फळ महोत्सव घडवून आणून बागायतदारांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
आपले व्यावसायिक काम करत असताना गोव्याशी संबंधित सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय आंदोलनांतही ते सक्रीय सहभाग घेतात. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. मात्र काही मुद्द्यांवर त्यांचा अतिरेकी विचार अनेकांना खटकतो आणि त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूरावतात.
अलीकडेच गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहीदास उर्फ दाद देसाई यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर वादळ उठले. हे वादळ विशेषतः गोवा सोडून गेलेल्या गोंयकारांनी आणि विशेषतः ख्रिस्ती बांधवांनी अधिक उत्साहाने उभे केले. स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या एका कामानिमित्त दाद देसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विजय सरदेसाई यांच्या “व्हिवा पोर्तुगाल” घोषणेवर प्रश्न विचारला. दाद देसाई यांना त्या घोषणेमागचा घटनाक्रम किंवा संदर्भ माहित असण्याचे कारणच नव्हते. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पदाला शोभणारी होती. पोर्तुगीजांनी केलेला छळ व गोंयकारांना दिलेली पीडा त्यांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे अशा पोर्तुगीजांचा जयजयकार करणे अयोग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
या वक्तव्यावरून सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जावर जाऊन त्यांना ट्रोल करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष या पदाचे भान न ठेवता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे खुलासा केला की, ही घोषणा देणाऱ्यांना आपण थांबवू शकत नाही; परंतु स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार म्हणून, आपल्या गावाने व कुटुंबाने पोर्तुगीजांची पीडा सहन केल्यामुळे आपण अशी घोषणा करू शकत नाही.
सोशल मीडियावर लोकांची टर उडवणाऱ्या अशा अनेक विषयांकडे दुर्लक्ष करणे योग्य असते. मात्र मिंगेल ब्रागांझा यांनी आपल्या फेसबुकवर टाकलेल्या काही पोस्टाव्दारे दाद देसाई यांच्याविषयी व्यक्त केलेली भूमिका व वापरलेली भाषा ही अत्यंत अशोभनीय अशीच आहे. स्वातंत्र्यसैनिक संघटनेला हिणवणे, कॅसिनो वा कुंकळ्ळी प्रदूषणाच्या विषयावर ते लोकांसोबत का नाहीत असा सवाल करणे, हे मिंगेल ब्रागांझा यांच्या बुद्धीला तरी शोभणारे नव्हते.
ज्यांनी आपले बालपण आणि युवावस्था स्वातंत्र्यलढ्यात घालवली, पोर्तुगीजांशी टक्कर दिली, त्या स्वातंत्र्यसैनिकांना आजच्या वयात ट्रोल करणे हे अयोग्य आहे. गोव्याला मुक्ती मिळवून देणे ही त्यांची देणगी आहे. मुक्तीनंतर गोवा सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपण ती जबाबदारी न पेलता स्वातंत्र्यसैनिकांच्या नावानेच रडत बसलो, तर आमच्यासारखी निर्लज्ज पिढी दुसरी नाही. राजकारण्यांवर तोंडसुख घेता घेता अचानक कुठेतरी आपली लेखणी घसरते तसाच काही प्रकार मिंगेल ब्रागांझा यांच्याबाबतीत घडला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन मिळते ह्यात मिंगेल ब्रागांझा यांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ही असुया त्यांच्यातील वेगळ्याच मानसिकतेचे दर्शन घडवते हे देखील लपून राहीलेले नाही. समाजातील काही अपवादात्मक प्रतिष्ठित व्यक्तींप्रती, विशेषतः स्वातंत्र्यसैनिकांप्रती, अशा भाषेचा वापर करणे अजिबात स्वीकारार्ह नाही. एक पत्रकार म्हणून या गोष्टींचा निषेध करणे व भूमिका घेणे हे माझे कर्तव्य समजतो म्हणूनच हा प्रपंच.






