मोपात कार रेसिंगचा थरार

कधीकाळी आपला स्वाभीमानी बाणा जपणारा पेडणेकर आज परिस्थितीसमोर शरणागती पत्करून इतका मानसिक लुळा पांगळा कसा झाला, याचे खरोखरच आश्चर्य वाटते.

वादग्रस्त सनबर्न महोत्सव यशस्वीपणे पार पडल्यावर पेडणेकरांच्या विरोधाचा सूर भाजप सरकारला चांगलाच उमगला. त्यामुळेच आता पेडणेत कुठलाही इव्हेंट आयोजित करण्यास सरकार कचरत नाही, हे फॉर्म्यूला ४ कार रेसिंग स्पर्धेच्या घोषणेवरून स्पष्ट होते. काही ठरावीक लोकांना हाताशी धरून त्यांना बक्षिसी वाटली की तेच अशा इव्हेंटचे प्रचारक ठरतात. मग विरोधकांची हवा काढण्यासाठी सरकारी यंत्रणांची फूस मिळाली की पुढे विचारायलाच नको. इव्हेंट यशस्वी झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विजयोत्सव साजरा करून फोटोसेशनची संधी मिळते. भाजपने विरोध मोडून काढण्याचे हे तंत्र आता बऱ्यापैकी आत्मसात केले आहे.
धारगळ पंचायतीला सनबर्न आयोजकांनी कचरा वाहन देण्याचे आश्वासन दिले होते, पण ते गावात फिरताना कधी दिसलेच नाही. सनबर्नच्या विरोधात आमदार उभे राहिले, मात्र भाजपने जीत आरोलकरांच्या माध्यमातून धारगळकरांनाच पुढे करून भव्य सभा आयोजित केली आणि महोत्सवाला जोरदार समर्थन मिळवले. त्या भाषणांकडे आज पाहिल्यावर अनेकांना स्वतःचीच लाज वाटते, पण राजकारण असेच खेळले जाते.
पेडणेचे पालकमंत्री अर्थात मुख्यमंत्री, तालुक्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी पालकत्वाच्या हक्काने वेगवेगळे इव्हेंट घडवून आणत आहेत. मुरगांववासीयांनी नाकारलेला फॉर्म्यूला ४ कार रेसिंगचा थरार आता मोपा विमानतळ परिसरात होणार आहे. या इव्हेंटवर तब्बल १८० कोटी रुपये खर्च होणार असून राज्य सरकार त्यात ५८ कोटींचा वाटा उचलणार आहे. म्हणे यामुळे गोव्याला क्रीडा पर्यटनाची नवी ओळख मिळेल, जगभरातील कार रेस प्रेमी गोव्याकडे आकर्षित होतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेसिंग कार आयोजक म्हणून गोव्याची प्रतिमा उभी राहील. स्थानिकांना व्यवसायाच्या संधी मिळतील, अशीही जोड दिली जाते.
सरकारला आता जनतेच्या प्रश्नांपेक्षा पर्यटकांना आकर्षित करण्याचे अधिक महत्त्व वाटते. पर्यटक आले नाहीत तर महसूल मिळणार नाही, कर्मचाऱ्यांना पगार, सामाजिक योजनांसाठी पैसा आणि विकासासाठी निधी मिळणार नाही. पर्यटक आले तर सरकारच्या तिजोरीत पैसा येईलच, शिवाय कमिशनच्या रूपात अनेकांचे वैयक्तिक खिसेही भरतील. मोपा परिसरात २८ कोटी रुपये खर्चून तात्पुरता ट्रॅक तयार होणार आहे, पण लोकांसाठीचे रस्ते मात्र खड्डेमय आहेत. रोज खड्ड्यांतून वाट काढत प्रवास करणाऱ्या जनतेच्या वेदना सरकारला दिसत नाहीत.
मोपा विमानतळामुळे रोजगार, व्यवसायाच्या संधी, आयुष इस्पितळासाठी स्थानिकांना प्राधान्य अशा अनेक आश्वासनांच्या आकाशातले तारे तोडले होते, पण ते सगळे कोसळले. मुख्यमंत्र्यांनी फॉर्म्यूला ४ स्पर्धेची घोषणा करून चोवीस तास उलटले तरी पेडणेच्या दोन्ही आमदारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. स्वागत करणे हेच त्यांचे काम राहिले आहे. इव्हेंटचे पास लोकांना वाटले की विरोधक हात चोळीत बसतील.
कधीकाळी स्वाभीमानी असलेला पेडणेकर आज इतका मानसिकदृष्ट्या खचला आहे, याचे आश्चर्य वाटते. नेतृत्वाने आपली विश्वासार्हता गमावली आहे. आत्तापर्यंत फक्त पेडणेकरांचा फायदा उठवून स्वतःची पोळी भाजणाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत पेडणेकरांना विश्वासार्ह आणि खंबीर नेतृत्व मिळणार नाही, तोपर्यंत कुणीही येईल आणि त्यांना टीळा लावून जाईल हे असेच घडत राहणार आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    27/06/2026 e-paper

    27/06/2026 e-paper

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    गोव्यासमोरील मूक आपत्ती