धारगळ बनावट विल प्रकरणाचे गांभीर्य वाढले
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)
धारगळ दाडाचीवाडी येथील जमिनीसंबंधी बनावट विलच्या आधारे एका आमदाराकडे ४० हजार चौ. मी. जमीन विक्रीचा करार करून सुमारे ४० लाख रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्व. शांताराम कानुळकर यांच्या विवाहित मुलींना डावलून सुभाष कानुळकर याने आपल्या नावे बनावट विल तयार केले आणि लगेचच ही जमीन आमदाराला विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
धारगळ दाडाचीवाडी येथील सर्वे क्रमांक ३४०/० मधील स्व. शांताराम कानुळकर यांच्या मालकीच्या ६० हजार चौ. मी. जमिनीच्या या गैरव्यवहाराचा तपास गुन्हा शाखा करत आहे. पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याकडे तपासाची सूत्रे असून, आता या व्यवहारात सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचा सहभाग असल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
विशेष म्हणजे, धारगळ येथील जमिनीचे बनावट विल सत्तरी-वाळपई येथे नोंदवले असल्याचे दाखवले गेले आहे. वाळपई उपनिबंधक कार्यालयाने हे विल त्यांच्या कार्यालयात नोंदले गेले नसल्याचा निर्वाळा दिला असून, त्यासंदर्भात वाळपई पोलिस स्थानकात ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तक्रार आजतागायत दाखलच करण्यात आलेली नाही. गुन्हा शाखेकडे तपास नोंद असूनही वाळपई पोलिस या तक्रारीबाबत कोणतीही हालचाल करत नसल्याने राजकीय दबावाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीडित कुटुंबियांची फरफट
स्व. शांताराम कानुळकर यांच्या दोन विवाहित मुली आहेत. त्यांच्या विवाहानंतर ते आपल्या मूळ घरी राहत होते. त्याच ठिकाणी त्यांच्या भावाचा नातू सुभाष कानुळकर याने ही शक्कल लढवली. शांताराम कानुळकर यांच्या मुलींना अंधारात ठेवून, त्यांच्या नावे बनावट विल तयार करून, शांताराम यांच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावे केल्याचे भासवले.
या बनावट विलच्या आधारे सुभाष कानुळकर याने एका आमदारासह इतर अनेक व्यक्तींशी करार करून लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ ही जमीन असल्याने, संधी साधून त्याने हा लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, सुभाष कानुळकर याच्या संपूर्ण कुटुंबाला या प्रकाराची माहिती असून, तेही या प्रकरणात गुंतले असल्याचे दिसून येते.
शांताराम कानुळकर यांच्या मुलींना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे व्यवहार पार पडले. बनावट विलच्या आधारे म्युटेशन करून सुभाषने आपले नाव एक चौदाच्या उताऱ्यावर चढवले आणि नंतर ही बाब शांताराम यांच्या मुली व जावयांच्या लक्षात आली. ही बनावटगिरी उघड करून न्याय मिळवण्यासाठी त्या सर्वत्र हेलपाटे मारत आहेत. मात्र, प्रशासन आणि न्यायालयाकडून अद्याप न्याय मिळत नसल्याने, राजकीय हस्तक्षेपामुळे सर्व मर्यादा ओलांडल्या जात असल्याचा अनुभव पीडित कुटुंबीय घेत आहेत.





