कुठे आहेत विरोधक ?

प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षहितापेक्षा राज्याचे आणि देशाचे हित नजरेसमोर ठेवून विरोधकांनी आपले नियोजन करणे आवश्यक आहे.

देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून आभासी परिस्थिती निर्माण करण्याचा सपाटा सुरू आहे. वास्तवाला फाटा देऊन चुकीच्या आणि खोट्या कल्पनांवर आधारित परिस्थिती निर्माण करायची आणि ती जनतेच्या गळी उतरवायची, ही नीती भाजपने अवलंबली आहे. या नीतीला जनता बळी पडत असल्याचे त्यांना दिसून आले आहे. खोट्या गोष्टींचा सातत्याने भडीमार केल्यानंतर लोकांना त्या खऱ्या वाटतात, हेही त्यांनी पाहिले आहे. जाहिरातबाजी आणि मीडियाचा वापर करून हे सगळे लोकांच्या माथी मारण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे—शंभर टक्के साक्षर राज्य, हर घर जल, उघड्यावर शौचमुक्त राज्य अशा गोष्टी सरकारने गोंयकारांच्या गळी उतरवून खऱ्या करून दाखवल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपल्या वाढदिनी २०२७ मध्ये २७ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करून ५१ टक्के मताधिक्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वप्ने पाहणे किंवा अशक्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवणे हे चुकीचे नाही, परंतु हे करत असताना आपले हसे होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. २०२२ मध्ये स्वबळावर २० जागा जिंकून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली. याशिवाय सहकारी पक्ष, अपक्ष आणि काँग्रेसच्या ८ आमदारांना पळवून सरकारच्या बाजूने ३३ आमदारांची फौज तयार करण्यात आली. ही फौज नाममात्र ७ विरोधी आमदारांसमोर ढेपाळते, हे अलिकडच्या पावसाळी अधिवेशनात जनतेने पाहिले आहे. विरोधकांची विधानसभेतील एकजूट जनतेला हुरूप देणारी ठरली असताना, आता एकमेकांविरोधात सुरू असलेली टीका निराशाजनक आहे. आम आदमी पार्टी स्वबळाची भाषा करू लागली आहे. काँग्रेसलाही आपले गतवैभव परत येण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. गोवा फॉरवर्ड पक्ष नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. आरजीपीने शेवटची एक संधी म्हणून पुन्हा स्वबळावरच ताकद लावण्याचा निर्धार केला आहे. विरोधी गटांतील या हालचाली पाहूनच कदाचित भाजपने २०२७ मध्ये २७ जागांची घोषणा केली असावी. विरोधक पुन्हा वेगवेगळे लढले तर विरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपला त्याचा लाभ होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवाणी करण्याची गरज नाही. विरोधकांनी आत्ताच एकत्र येऊन आपली रणनिती आखण्याची गरज आहे. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी एकत्र बसून युतीबाबतची बोलणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकजण एकमेकांना भाजपचा सोयरा म्हणून पाहू लागले, तर सत्ता मिळवणे शक्य नाही. निवडणुका जवळ आल्या की भाजपमधील अनेकजण विरोधकांकडे येणार आहेत, कारण तिकिट वाटपात अनेकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. विरोधकांमध्ये जो संवाद अपेक्षित आहे, तो अजिबात होताना दिसत नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे, परंतु सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षहितापेक्षा राज्याचे आणि देशाचे हित नजरेसमोर ठेवून विरोधकांनी आपले नियोजन करणे आवश्यक आहे. हे नियोजन न करता केवळ स्वहिताचा अजेंडा पुढे नेला, तर जनतेवर दोषारोप करून काहीही उपयोग होणार नाही.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 14, 2026
    • 15 views
    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 14, 2026
    • 19 views
    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 14, 2026
    • 20 views
    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 18 views
    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 20 views
    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 26 views
    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure