चटका लावणारी एक्झिट

गोव्याला आज आवाज उठवणाऱ्या, लोकांसाठी धावून जाणाऱ्या आणि सत्तेपेक्षा सेवेवर विश्वास ठेवणाऱ्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या रूपाने अशीच एक आशा निर्माण झाली होती

डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण  गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत होणे ही केवळ एका कुटुंबाची किंवा एका राजकीय पक्षाची हानी नाही, तर गोव्याच्या सार्वजनिक जीवनाची मोठी पोकळी आहे.

डॉ. भाटीकर हे व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होते; पण त्यांची ओळख केवळ डॉक्टर म्हणून मर्यादित नव्हती. समाजकार्य, रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती, युवकांमध्ये संघटन, गरजूंसाठी मदतीचा हात आणि फोंडा मतदारसंघातील लोकांशी सातत्याने संपर्क या माध्यमातून त्यांनी स्वतःभोवती विश्वासाचे वर्तुळ तयार केले होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांचा स्वभाव कार्यकर्त्यांचा, लोकांमध्ये मिसळणारा आणि थेट संवाद साधणारा असा राहिला.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली आणि अत्यंत कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव त्यांच्यासाठी शेवट नव्हता, तर पुढील राजकीय प्रवासाची सुरुवात होती. फोंड्यातील मतदारांनी एका नवख्या पण मेहनती तरुण नेतृत्वाला दिलेला प्रतिसाद लक्षवेधी होता. कमी मतांनी पराभूत झाल्यानंतरही त्यांनी मतदारांशी नाळ तुटू दिली नाही. याच सातत्यामुळे त्यांच्याकडे फोंड्यातील एक उदयोन्मुख चेहरा म्हणून पाहिले जात होते.

नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि फोंडा पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले. मात्र ही पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि तो विषय अद्याप न्यायप्रविष्ट आहे. आमदारकीचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत होते; पण त्यामागे सत्तेची लालसा नव्हती, तर फोंड्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची उमेद होती, असे त्यांच्या कार्यातून दिसत होते.

डॉ. भाटीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी जमेची बाजू होती. ते राजकारणात आले, पण लोकांपासून दूर गेले नाहीत. डॉक्टर म्हणून त्यांना माणसांच्या वेदना समजत होत्या आणि समाजसेवक म्हणून त्या वेदनांवर उपाय शोधण्याची त्यांची धडपड होती. युवा पिढीशी त्यांची सहज नाळ जुळत होती. फोंड्यातील अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग केवळ प्रसिद्धीसाठी नव्हता, तर प्रत्यक्ष काम करण्यासाठी होता.

आज गोव्याच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवते. अनेक तरुण राजकारणात येतात, पण टिकत नाहीत; काही टिकतात, पण लोकांपासून दूर जातात. डॉ. केतन भाटीकर यांच्याकडे लोकांमध्ये राहून राजकारण करण्याची क्षमता होती. त्यामुळे त्यांचे जाणे अधिक चटका लावणारे आहे. त्यांनी अजून मोठी राजकीय वाटचाल करायची होती. अजून अनेक भूमिका घ्यायच्या होत्या. अजून अनेक स्वप्ने पूर्ण करायची होती. पण नियतीने त्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवला.

त्यांच्या जाण्याने फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होईलच; पण त्यापेक्षा मोठा परिणाम सामाजिक क्षेत्रावर होईल. कारण डॉ. भाटीकर हे निवडणुकीपुरते सक्रिय असणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. लोकांशी संपर्क, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाला योगदान देण्याची त्यांची वृत्ती ही त्यांची खरी ओळख होती.

अशा व्यक्तींचे स्मरण केवळ श्रद्धांजलीच्या शब्दांत मर्यादित राहू नये. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजकार्य, सार्वजनिक जीवन आणि स्वच्छ राजकारणात पुढे येणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. गोव्याला आज आवाज उठवणाऱ्या, लोकांसाठी धावून जाणाऱ्या आणि सत्तेपेक्षा सेवेवर विश्वास ठेवणाऱ्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या रूपाने अशीच एक आशा निर्माण झाली होती.

त्यांचे आमदारकीचे स्वप्न अधुरे राहिले, पण त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून निर्माण केलेला ठसा कायम राहील. त्यांच्या जाण्याने गोव्याने एक तरुण, ऊर्जावान आणि आशादायी नेता गमावला आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना, समर्थकांना आणि फोंड्यातील जनतेला हा धक्का सहन करण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना.

  • Related Posts

    Advocate, Client Assaulted Over Demolition Dispute in Morjim; Mandrem Police Register Case

    Mandrem Police have registered a case against several persons following an alleged assault on an advocate and his client at Temwada, Morjim, in connection with a dispute over a court-ordered demolition.

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    The Students Islamic Organisation (SIO) of India, Goa Zone, has demanded accountability from the Directorate of Education (DoE) over a withdrawn circular that allegedly described the organisation as “potentially anti-social and anti-national,” stating that the withdrawal alone cannot undo the damage caused to its reputation.

    You Missed

    Advocate, Client Assaulted Over Demolition Dispute in Morjim; Mandrem Police Register Case

    • By Gaonkaari
    • जुलै 18, 2026
    • 12 views
    Advocate, Client Assaulted Over Demolition Dispute in Morjim; Mandrem Police Register Case

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 17 views
    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 19 views
    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 16 views
    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    17/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 17, 2026
    • 14 views
    17/07/2026 e-paper