पणजी,दि. २२ : गोव्याचे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्याबाबत एक धक्कादायक आणि संशयास्पद प्रकरण समोर आले आहे. अयोध्या येथील पोलिस स्टेशनमधून पाठविल्याचा दावा करत त्यांना व्हॉट्सअपवर एक कथित पोलिस नोटीस पाठविण्यात आली. मात्र वकिलांच्या माध्यमातून चौकशी केली असता ही नोटीस पूर्णपणे बोगस असल्याचे समोर आले आहे.
सी. राम सागर नावाच्या व्यक्तीकडून पाठविण्यात आलेल्या या नोटीसमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ अंतर्गत कलम १७९ चा उल्लेख करण्यात आला होता. अर्जुनकुमार यादव नामक व्यक्तीच्या तक्रारीवरून ५ जून २०२६ रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. तसेच राम सागर गुप्ता नावाच्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत ही नोटीस पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र ही नोटीस मिळाल्यानंतर घाबरून न जाता स्वप्नेश शेर्लेकर यांनी तात्काळ आपल्या एका वकिल मित्रांशी संपर्क साधला. या वकिल मित्राने ताबडतोब आपल्या उत्तर प्रदेशातील संपर्काचा उपयोग करून संबंधित नोटीस उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील संबंधित पोलिस स्थानकात पडताळणीसाठी एका व्यक्तीकडे पाठवली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
सध्या कारापूर-सर्वण येथे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात गेले ४८ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीने स्वप्नेश शेर्लेकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला आहे. त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांकडून विविध पोलिस स्थानकांमध्ये त्यांच्याविरोधात तक्रारी आणि निवेदने देण्याचे सत्रही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कारापूर प्रकल्पातील कथित बेकायदेशीर बाबींविषयी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा विषय आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकल्पासंदर्भात कायदे, नियम आणि पर्यावरणीय प्रक्रियांना कथितपणे बगल देण्यात आल्याचा आरोप करत स्वप्नेश शेर्लेकर यांनी प्रकल्पधारक, सरकार आणि जमीन व्यवहाराशी संबंधित घटकांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कारापूर-सर्वण पंचायत मंडळावर दबाव टाकून ग्रामसभेच्या ठरावानुसार कंपनीला नोटीस पाठविण्यापासून रोखण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या व्यवहारांबाबत पोलखोल केल्यामुळेच आता आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा संशय कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले की, सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होताना संभाव्य दबाव, धमक्या आणि अडचणी यांची कल्पना ठेवावी लागते. मात्र देशभरातील वकिल, अधिकारी, संशोधक आणि कार्यकर्त्यांशी निर्माण झालेल्या विश्वासार्ह संपर्क साखळीमुळे बदनामीचे खटले असोत किंवा अशा बोगस नोटिसा, त्यांना सामोरे जाणे आता अधिक सोपे झाले आहे.
“दबाव किंवा धमक्यांसमोर झुकण्याऐवजी शांत चित्ताने आणि कायदेशीर मार्गाने लढण्याची मानसिकता ठेवली, तर मार्ग नक्की निघतो. अशा प्रकारची साखळी राज्यभर उभी राहिली, तर प्रामाणिकपणे लढणाऱ्यांना घाबरण्याची गरज उरणार नाही,” असेही शेर्लेकर यांनी म्हटले.





