अरविंद केजरीवाल यांचा आरोप
गांवकारी, दि .३ (प्रतिनिधी)
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या ‘चंदा-चोरी’ प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना नेमके कुणाचे अभय मिळत आहे, असा सवाल आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. या चोरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनभिज्ञ राहू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर नेते उपस्थित होते. श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी गोव्यातील आणि देशभरातील हिंदूंनी आनंद व भक्ती व्यक्त केली होती. मात्र या घोटाळ्याच्या उघडकीमुळे लोकांना फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्ट पंतप्रधानांनी स्वतः स्थापन केला आणि प्रत्येक सदस्य स्वतः निवडला असल्याने, त्यांना माहिती नसणे शक्य आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.
एसआयटी की धुळफेक?
श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) हे केवळ जनतेला दिशाभूल करण्यासाठी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ही निव्वळ धुळफेक असून प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
अमित शहा दर्शन का घेत नाहीत?
श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिराला भेट दिली नाही, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ८९१ दिवस उलटून गेले तरी ते तिथे पोहोचले नाहीत, याचे रहस्य काय, असा सवाल त्यांनी केला.
जमीन व्यवहारातील घोटाळ्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “२०२१ मध्ये जमीन २ कोटींना विकत घेऊन केवळ १० मिनिटांत मंदिर ट्रस्टला १८ कोटींना विकली गेली.” बांधकामातील भ्रष्टाचार, सीसीटीव्ही फुटेज डिलीट होणे, ४०% कमिशन मागणे अशा अनेक बाबी त्यांनी मांडल्या.
गुप्तचर विभागाने पंतप्रधानांना किमान १२ अहवाल दिले होते, तरीही त्यांनी मौन का बाळगले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.







