स्वप्नेश शेर्लेकर यांची जोरदार मागणी
गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या राजीनाम्यासाठी कारापूर-सर्वणचे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रकरणी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला; पण कारापूरातील भावी पिढीचे अस्तित्वच संपवायला निघालेल्या विश्वजीत राणेंचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कधी घेणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला.
कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता ११३ दिवस पूर्ण झाले आहेत. हळदोणा, खोर्ली-तिसवाडी आणि चिंबलच्या ग्रामस्थांनी कारापूरला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. राज्यातील भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेने कळस गाठला आहे. चार महिने उलटून गेले तरी आंदोलनाच्या ठिकाणी सरकारचा एकही आमदार, मंत्री किंवा पदाधिकारी पोहोचला नाही, याला काय म्हणावे, असा सवाल शेर्लेकर यांनी उपस्थित केला.
या आंदोलनाबाबत न्यायालयीन लढा सुरू आहे आणि तिथे नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्याच्या राजकीय इतिहासात कारापूरच्या आंदोलनाची नोंद होणार आहे.
सरकारातीलच एक मंत्री आपली जमीन बिल्डरला विकतो, मंत्री म्हणून बेकायदा परवाने देतो आणि एक गाव उध्वस्त करून प्रकल्प उभारतो—हे लोकशाहीला शोभणारे नाही. कारापूरच्या लोकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कितीही झाला तरी जितके दिवस हे आंदोलन लांबेल तितकाच त्यांचा निर्धार अधिक प्रखर होईल.
कारापूरच्या या पीडित आंदोलकांच्या प्रखरतेच्या निखाऱ्यातच या सत्तेची राख होणार, असेही शेर्लेकर म्हणाले.





