जनतेच्या कौलाचा सदुपयोग करून देशाची अखंडता, सर्वधर्म समभाव, समानता आणि संविधानाचा आदर राखणे ही खरी राष्ट्रसेवा आहे. भाजप या मार्गाने जाणार की वेगळी वाट चोखाळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू आहे. हा अग्रलेख लिहिताना आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल करत आहे. केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा बुरूज ढासळत असून काँग्रेस पुनरागमनाच्या मार्गावर आहे. तामिळनाडूमध्ये सेनेस्टार विजय तलपती यांच्या टीव्हीके पक्षाने स्टॅलिनच्या राजवटीला सुरूंग लावत पहिल्याच निवडणुकीत दमदार प्रवेश मिळवला आहे. पुदुचेरीत एआयएनआरसी या प्रादेशिक पक्षाच्या साथीने भाजप आपले अस्तित्व टिकवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे.
आजच्या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे पश्चिम बंगालमधील भाजपची एन्ट्री. प्रारंभी काँग्रेस आणि बंगला काँग्रेसकडे असलेले हे राज्य नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या ताब्यात गेले आणि डाव्यांचा बालेकिल्ला बनले. त्या बालेकिल्ल्याला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सुरूंग लावला. आता मागील १५ वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरूंग लावून आपला कब्जा मिळवला आहे. एका राजकीय विश्लेषकाच्या मतानुसार, डाव्यांकडून थेट उजव्यांकडे वळलेले बंगालचे राजकारण पुढे कोणते वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भाजपचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भगवा फडकावून त्यांना मोठी आदरांजली वाहिली आहे.
निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप, सत्तेचा दुरुपयोग या चर्चा वेगळ्या असल्या तरी भाजपची मेहनत, रणनिती आणि पद्धतशीर काम याचे श्रेय कुणीही नाकारू शकत नाही. फक्त ममता बॅनर्जी यांच्या दीर्घ सत्तेला कंटाळून मतदारांनी बदल केला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. हा बदल घडवून आणण्यासाठी भाजपने घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. विरोधकांनी यापासून धडा घेणे गरजेचे आहे.
गोव्याचा विचार केला तर इथेही मागील १४ वर्षे भाजपची राजवट आहे. कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि राजकीय दहशतीचे वातावरण असूनही लोक आपोआप विरोधकांना सत्ता देतील, ही शक्यता कमी आहे. भाजपने बुथ संघटना मजबूत करणे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, गटनिहाय मतदारांपर्यंत पोहोचणे यावर भर दिला आहे. उलट विरोधक आर्थिक पाठबळाअभावी गतप्राण झाले आहेत. सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट टाकण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व दिसते. रस्त्यावर थोडेसे आंदोलन दिसले तरी त्यात जोश नाही. एकत्र येण्याबाबतही विरोधक अपयशी ठरले आहेत.
भाजपच्या सत्तेचा हा अश्वारूढ सूसाट बनला आहे. एकापेक्षा एक राज्ये पादाक्रांत करत भाजप पुढे जात आहे. हा जनतेचा कौल असेल तर त्या जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाला आवर घालणे आवश्यक आहे. जनतेच्या कौलाचा सदुपयोग करून देशाची अखंडता, सर्वधर्म समभाव, समानता आणि संविधानाचा आदर राखणे ही खरी राष्ट्रसेवा आहे. भाजप या मार्गाने जाणार की वेगळी वाट चोखाळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







