मांद्रे मतदारसंघाची भरकटणारी राजकीय वाटचाल

आत्तापर्यंत अँटॉनी डिसोझा, भाऊसाहेब बांदोडकर, रमाकांत खलप, संगीता परब, लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद सोपटे आणि विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदारसंघाचे नेतृत्व केले. हा मतदारसंघ सर्वाधिक काळ मगो पक्षाकडे राहिला. तब्बल सलग ४५ वर्षे या मतदारसंघावर मराठा समाजाचे वर्चस्व राहिले, हे निर्विवाद सत्य आहे.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हेकेखोर आणि मराठा समाजाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे या मतदारसंघात भंडारी नेतृत्व उदयास आले आणि गेली नऊ वर्षे भंडारी समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आमदार जीत आरोलकर यांच्यावर मतदारसंघाबाहेरील असल्याचा आरोप प्रारंभी करण्यात आला, पण त्यांनी आपला मतदान हक्क मांद्रे गावात स्थलांतरित केल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
सोपटे आणि पार्सेकर हे एकत्र येऊन जीतला पराजित करण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. मात्र, दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तरी यश मिळेलच, अशी खात्री नाही. त्यामुळे पार्सेकर वेगळी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. पुन्हा आमदार झाल्याशिवाय राजकीय सन्यास घेणार नाही, अशी पार्सेकर यांची प्रतिज्ञा २०२७ मध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
जीत आरोलकर यांचा पराभव पार्सेकर आणि सोपटे एकत्र येऊन करू शकत नाहीत, पण सोपटे नक्कीच करू शकतात. कारण त्यामागे अनेक कारणे आहेत जी मतदारसंघ भ्रमण केल्यावर लक्षात येतात. पार्सेकर यांचे आमदार होण्याचे स्वप्न फक्त काँग्रेसच्या चिन्हावरच पूर्ण होऊ शकते; अन्य कुठल्याही चिन्हावर ते शक्य नाही.
पार्सेकर हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. रमाकांत खलप यांनी सहा वेळा विजय मिळवून आपली कारकीर्द यशस्वी ठरवली. पार्सेकर यांच्या दूरदृष्टीमुळे मांद्रे मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण पेडणे तालुक्याचा चेहराच बदललेला दिसतो.
भाजप उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत असू शकेल की नाही, हा प्रश्न आहे. कारण भाजप मगोशी किंवा ढवळीकर यांच्याशी संबंध तोडू शकत नाही. लोकदृष्टीने मुख्यमंत्री आणि आरोलकर यांचे संबंध चांगले असले तरी भाजप सोपटे यांच्यावर अन्याय करू शकत नाही. अन्यथा त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
जायंट किलर आणि पार्सेकर एकत्र येणे ठीक आहे, पण सोपटे यांच्याकडे असलेली कार्यकर्ता फळी पार्सेकर यांना बळ देऊ शकत नाही. मात्र, सोपटे यांना पार्सेकर यांचे कार्यकर्ते सहज पाठींबा देऊ शकतात. पार्सेकर यांच्यासाठी तिरंगी लढत फायदेशीर ठरली आहे, याची जाणीव असल्यास ते सोपटे किंवा आपण ही घोषणा बंद करतील.
आज सगळीकडे ‘विकास पुरुष’ म्हणून सर्व मीडियावाले आमदार आरोलकर यांची प्रशंसा करतात, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या मतदारसंघाला २०२२ नंतर काय मिळाले? याचे उत्तर शोधले तर शिगमोत्सव सारखा मोठा प्रकल्प दिसतो, जिथे हजारो नागरिक दररोज आपली रोजीरोटी कमावतात. कर्निव्हाल सारखा संस्कृती दर्शन घडवणारा सोहळा, दीपोत्सव सारखा प्रचंड मोठा विकास. धार्मिक संस्कृतीचे जतन होणे अनिवार्य आहे, पण मूलभूत सुविधांचा विचार कधी होणार? की फक्त पाच वर्षे मनोरंजन मतदारसंघ म्हणून राहणार आहे?
हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन व्यवस्था नसताना देखील त्याला ‘हॉस्पिटल’ म्हणणे म्हणजे जनतेला दाखवलेली एक प्रकारची जम्बो सर्कस. वादळी परिस्थितीत नागरिकांना केंद्र सरकारच्या निधीतून आपत्कालीन निवासी सेवा निर्माण केलेल्या ठिकाणी दहशत निर्माण होऊ नये म्हणून पोलीस स्थानक पाहिजेच या भावनेतून मुख्यमंत्रीांकडे अट्टहास करून स्थापन केलेले पोलीस स्थानक म्हणजे मतदारसंघातील जणू भाड्याच्या इमारतीत उभारलेला महाविक्रमी प्रकल्प अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.
२५ जानेवारी २०२४ रोजी घोषणा करण्यात आली की पुढील एका वर्षात मतदारसंघासाठी पोलीस स्थानकाच्या स्वतःच्या नावे जागा मिळेल आणि स्वतंत्र सुसज्ज इमारत उभी राहील. पण शेवटी ती घोषणा फुसका बार ठरली. निवडणुकीच्या तोंडावर कलाकारांचे मन राखण्यासाठी ‘रवींद्र भवन’च्या नावाखाली स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी चाललेली शेवटची केविलवाणी धडपड सुरू आहे.
मोठमोठे क्रीडा प्रकल्प उभारले जातील अशी घोषणा गोविंदरावांना आमंत्रित करून केली, पण मुहूर्त भेटत नाही. तोही गाजर निवडणूक जाहीर होण्याआधी एक महिना आधी दिला जाईल. सुसज्ज मच्छिमार केंद्रासाठी मंत्री हळर्णकर यांना आमंत्रित करून घोषणाबाजी झाली, पण इथे सरकारी तिजोरी कमी पडली असे वाटते.
तुये येथील औद्योगिक वसाहतीत युवकांच्या भवितव्यासाठी एकही जनहितार्थ प्रकल्प स्थापन करता आला नाही, तिथे अपेक्षा काय ठेवायची? फक्त वडापाव धंदे करण्याएवढीच आमची लायकी उरली आहे का? कधी होणार दूरदृष्टी आणि व्यापक विचार? हा सुशिक्षित नागरिकांचा मतदारसंघ ज्याने मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रशासनात चांगले अधिकारी दिले, पण आज हाच भाऊसाहेबांचा मतदारसंघ, जिथे खलप भाईंनी तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केले, तो पूर्णपणे ढासळताना दिसतो.
मांद्रे मतदारसंघ फक्त मनोरंजन मतदारसंघ करून ठेवला आहे, हे आपण अभिमानाने सांगू शकतो. रस्त्यावर डांबर जनतेने वेळोवेळी आवाज उठवला म्हणून नाईलाजास्तव कुठून तरी आणून डांबर टाकले. कॉन्ट्रॅक्टदार बिचारे आर्थिक मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या कुळांना हक्क देणार होते, त्यांच्याच जमिनीवर नांगर फिरवून आता कलाकारांसाठी प्रत्यक्ष जागेवर न जाता भवन उभारले जात आहे. हा आणखी एक निवडणूक गाजर!
जमीन कला व संस्कृती खात्याच्या नावावर झाली का? सरकारी निविदा कधी काढली? हे रवींद्र भवन बांधण्यासाठी कुणी खाजगी पुरस्कर्ता आहे का? मांद्रे मतदार संघाला मूर्ख बनविण्याचा कळस बांधला गेला आहे.
ज्या नेतृत्वाला जीएमसी लिंक तुये हॉस्पिटलमध्ये अजून आपत्कालीन सेवा सुरू करता आली नाही आणि म्हणे हॉस्पिटल कार्यान्वित केले, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. तुये इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे काय झाले? पांढरा हत्ती झाला की पुढे होणार आहे?
हा आहे ‘विकास पुरुषा’चा डंका. मांद्रे मतदारसंघ अधोगतीच्या मार्गावर चालला आहे. जनता शांतचित्त होऊन निरीक्षण करत आहे. सुशिक्षित मतदारसंघात अशिक्षितपणाचा कळस गाठला जात आहे, तरीही जनता डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे.
अपेक्षा कुणाकडून ठेवावी, हा प्रश्न नागरिकांकडून खाजगीत मिळणाऱ्या उत्तरांतून स्पष्ट होतो. अधिकारी वर्ग एवढा ‘होयबा’ कसा होऊ शकतो, हा प्रश्न जनतेसमोर आहे. त्यामुळे जनता योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहे.
पाडू चला रे भिंत ही मधे आड येणारी,
या मनामनातून बांधुया ही वाट जाणारी,
चल अपुल्या एकीतरेही नाव तरणारी,
या मनामनातून बांधुया ही वाट जाणारी!
………………………………..
अँड. अमित अंकुश सावंत
माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य
ग्रामपंचायत – मांद्रे

  • Related Posts

    How Mauvin’s Hindutva appeasement blew up in his face

    Devika Sequeira There’s a limit to how far you can go to endear yourself to the Hindutva mob at the expense of the beliefs of others, as Mauvin Godinho learnt…

    खरा नेता कोण..?

    म्हणूनच आता वेळ आली आहे, आपल्या मताचा योग्य वापर करण्याची, आणि खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला पुढे आणण्याची. नेतृत्व म्हणजे फक्त पैसे खर्च करण्याची ताकद नाही. खऱ्या नेतृत्वासाठी लोकांसाठी…

    You Missed

    02/05/2026 e-paper

    02/05/2026 e-paper

    मांद्रे मतदारसंघाची भरकटणारी राजकीय वाटचाल

    मांद्रे मतदारसंघाची भरकटणारी राजकीय वाटचाल

    श्रमशक्तीची अवहेलना थांबवा

    श्रमशक्तीची अवहेलना थांबवा

    कामगार उपाशी, सरकार तुपाशी

    कामगार उपाशी, सरकार तुपाशी

    Goa Police Crack 2025 Dacoity Cases; Six Accused Arrested After Nationwide Hunt

    Goa Police Crack 2025 Dacoity Cases; Six Accused Arrested After Nationwide Hunt

    30/04/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 30, 2026
    • 17 views
    30/04/2026 e-paper