देशप्रेमाची प्रचिती द्या; स्वप्नेश शेर्लेकर यांचे आव्हान
गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)
सांगे तालुक्यातील कोळंब येथील खाण लीज एका पाकिस्तानी नागरिकाच्या नावे होते आणि कराची येथे करण्यात आलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे या लीजचे नूतनीकरण करण्यात आले, असा गंभीर दावा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला आहे. या खाण लीजचे नूतनीकरण कुणी केले आणि प्रत्यक्षात ही खाण कुणी चालवली, याचा सरकारने जनतेसमोर खुलासा करावा, असा सवाल त्यांनी केले आहे.
विरोधक आणि आंदोलकांना ‘देशद्रोही’ ठरवणाऱ्या सरकारने या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर आणून आपले देशप्रेम सिद्ध करावे, असे आव्हानही शेर्लेकर यांनी दिले आहे.
व्हिडिओतून गंभीर दावे
स्वप्नेश शेर्लेकर यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून हे प्रकरण समोर आणले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगे तालुक्यातील कोळंब येथील टी.सी. क्र. १४/५२ हे खाण लीज एका पाकिस्तानी नागरिकाच्या नावे होते. संबंधित पाकिस्तानी नागरिकाशी कराची येथे पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली आणि त्याआधारे या लीजच्या नूतनीकरणाची प्रक्रिया करण्यात आली, असा त्यांचा दावा आहे.
पाकिस्तानला शत्रू राष्ट्र मानले जात असताना आणि शत्रू राष्ट्रातील नागरिकांच्या मालमत्तेबाबत स्वतंत्र कायदेशीर तरतुदी अस्तित्वात असताना, पाकिस्तानी नागरिकाशी संबंधित या खाण लीजचे नूतनीकरण कसे झाले, असा प्रश्न शेर्लेकर यांनी उपस्थित केला आहे.
१९५१ पासूनचे प्रकरण
शेर्लेकर यांनी मांडलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात १९५१ मध्ये झाली. कोळंब परिसरातील सुमारे १०० हेक्टर क्षेत्राचे खाण लीज पोर्तुगीज राजवटीत मडगावस्थित बद्रुद्दीन भवानी नामक व्यक्तीला देण्यात आले होते. गोवा मुक्तीनंतरही हे लीज कायम राहिले. संबंधित व्यक्तीने कालांतराने पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारल्याचा दावा शेर्लेकर यांनी केला आहे.
‘खाण सचिवांच्या शेऱ्यानंतरही नूतनीकरण?’
या प्रकरणातील आणखी गंभीर मुद्दा उपस्थित करताना शेर्लेकर यांनी दावा केला की, संबंधित लीजचे नूतनीकरण करू नये, असा स्पष्ट शेरा तत्कालीन खाण सचिवांनी नोंदवला होता. तरीही दिगंबर कामत खाणमंत्री असताना या लीजचे नूतनीकरण करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
त्या काळात खाणमंत्री असलेले दिगंबर कामत सध्या भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे शेर्लेकर यांनी म्हटले आहे.
कराचीतील ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ कुणाच्या हातात?
संबंधित खाणपट्ट्यासाठी कराची येथे करण्यात आलेली पॉवर ऑफ अॅटर्नी गोव्यात नेमकी कोण वापरत होते आणि प्रत्यक्ष खाण व्यवसाय कोण चालवत होते, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेर्लेकर यांनी केली आहे.
“पाकिस्तानी नागरिकाच्या नावे असलेले खाण लीज गोव्यात कोण चालवत होते? त्यातून निर्माण झालेला आर्थिक लाभ कुणाला मिळाला? या खाणीच्या माध्यमातून गोव्यातील पैसा पाकिस्तानपर्यंत पोहोचला का?” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
‘देशप्रेमाच्या भाषणांपेक्षा खुलासा करा’
विरोधक, आंदोलक आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांच्या देशप्रेमावर संशय उपस्थित करण्यापेक्षा सरकारने या प्रकरणातील कागदपत्रे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी शेर्लेकर यांनी केली.
खाण लीजची मूळ मालकी, संबंधित व्यक्तीचे नागरिकत्व, कराचीतील पॉवर ऑफ अॅटर्नी, नूतनीकरणाची प्रक्रिया, तत्कालीन अधिकाऱ्यांनी नोंदवलेले शेरे आणि प्रत्यक्षात खाण चालवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची माहिती सरकारने जाहीर करावी, असे ते म्हणाले.
“या संपूर्ण प्रकरणावर सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांऐवजी खरी वस्तुस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल,” अशी मागणी स्वप्नेश शेर्लेकर यांनी केली आहे.





