
डोंगर पठारावरील मेगा प्रकल्पामुळे जिवीत व मालमत्तेचे संकट
गांवकारी, दि.२७ (प्रतिनिधी)
ताळगांव मतदारसंघातील ओडशेल गावात आदिवासी समाजाची वस्ती असून, हे लोक मुख्यतः मुंडकार आहेत. या गावाच्या डोंगर पठारावर भाटकाराचा एक मेगा प्रकल्प सुरू आहे, जो समुद्राचे दर्शन घडवणारा असल्यामुळे महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, सर्व परवाने अनेक वर्षांपूर्वी मंजूर झाले आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
निसर्गाचा कोप आणि वाढती भीती
या खोदकामामुळे पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली, त्यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील टप्प्यात बहुमजली इमारतींची उभारणी होणार असल्यामुळे आदिवासी लोकांच्या सुरक्षिततेवर कायम संकटाचा धोका आहे.
राजकीय पाठबळ आणि आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष
या प्रकल्पाला स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच ताळगांव पंचायतचे समर्थन मिळाले असून, राजकीय नेत्यांचा वरदहस्त या प्रकल्पावर आहे. त्यामुळे ओडशेल-ताळगांवच्या आदिवासी लोकांच्या मदतीला कुणीही येत नाही. या मजबूत राजकीय सत्ता आणि दबावापुढे हे लोक असहाय्य झाले आहेत. ‘‘आदिवासी समाजाला कायम संकटात ठेवायचे आहे काय?’’ असा ज्वलंत सवाल सेसिल रॉड्रिगीस यांनी उपस्थित केला आहे.
सरकार आदिवासी हितसंबंध जपण्याचा दावा करत असले तरी, मोन्सेरात दांपत्याच्या दबावामुळे या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची उदासीनता
या भूस्खलनाची कोणतीही शासकीय पाहणी अद्याप झाली नाही. स्थानिकांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सेसिल रॉड्रिगीस आणि फ्रान्सिस कुएलो यांना आमदार आणि पंचसदस्यांकडून धमक्या मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज्यातील आदिवासी नेत्यांनीही या विषयावर मौन बाळगल्यामुळे समाजाला कोणताही आधार मिळत नसल्याची भावना वाढत आहे.
संभाव्य धोका आणि स्थानिकांची मागणी
सभापती रमेश तवडकर यांनी ओडशेल गावाला भेट देणार असल्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्यांची भेट झालेली नाही.
‘उटा’ संघटनेचे नेते प्रकाश वेळीप यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असली तरी ठोस उपाययोजना होत नसल्याची स्थानिकांची नाराजी आहे. सेसिल रॉड्रिगीस यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असले तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. स्थानीय लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सेसिल रॉड्रिगीस यांनी केला आहे. अजून मान्सून सुरू झालेला नसतानाही या पठारावरील मातीचा ढीग पाहून स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओडशेलमध्ये वायनाडसारखी आपत्ती होणार नाही ना, अशी चिंता स्थानिक व्यक्त करत आहेत. सरकारने आदिवासी समाजाकडे होणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी सेसिल रॉड्रिगीस यांनी केली आहे.
राजकीय नेत्यांचा वरदहस्त या प्रकल्पावर आहे. त्यामुळे ओडशेल-ताळगांवच्या आदिवासी लोकांच्या मदतीला कुणीही येत नाही. या मजबूत राजकीय सत्ता आणि दबावापुढे हे लोक असहाय्य झाले आहेत. या आदिवासी समाजाला कायम संकटात ठेवायचे आहे काय?
– सेसिल रॉड्रिगीस – आप नेत्या