पाकिटे पोहोचली…

महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे.

राज्यात पहिल्यांदाच जिल्हा पंचायत निवडणुकांना राजकीय रंग चढला आहे. यापूर्वी कधीच इतक्या सक्रीयतेने, आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचा कारभार बाजूला सारून जिल्हा पंचायत उमेदवारांच्या प्रचारासाठी जीव ओतून काम करताना पाहायला मिळाले नव्हते. जिल्हा पंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात असल्याने भाजपसाठी चिन्हाची प्रतिष्ठा नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत काबीज करण्याच्या प्रयत्नात पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहेत. अर्थातच जिल्हा पंचायत निवडणुकांचा निकाल म्हणजे २०२७ च्या विधानसभेची चाहूल ठरेल. त्यामुळे भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाही. पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी आपापल्या मतदारसंघांत सक्रीयपणे काम करताना दिसत आहेत.
गेली १२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला आपल्या सरकारचा विकास लोकांना पटवून देण्यासाठी जी धडपड करावी लागते आहे, ती पाहताना प्रश्न पडतो की हा विकास लोकांना अनुभवता आलेला नाही काय? वास्तविक भाजप विकासाचे जे रंगीत चित्र तयार करते, ते खरे तर लोकांनी अनुभवायला हवे होते. लोकांना त्याची जाणीव का होत नाही, यावरूनच हा विकास काल्पनिक किंवा अवास्तव असावा, असे वाटते.
पेडणेच्या विकासाची जंत्री वाचताना पत्रादेवी–बांबोळी महामार्ग, मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ यांचीच यादी सादर केली जाते. मात्र आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि रोजगाराच्या बाबतीत पेडणेच्या अवस्थेवर कुणीही बोलायला तयार नाही. तुये–पेडणेत जीएमसी संलग्न इस्पितळाच्या इमारतीवर शंभर कोटी रुपये खर्च करून आता तिथे सामाजिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याच भाजप सरकारने धुळीस मिळवला. हे ते जाणूनही बोलू शकत नाहीत, कारण त्यांना पुन्हा पक्षप्रवेशाची आशा लागून राहिलेली आहे.
भाजपच्या एकूण यशाचे गमक या महिला आहेत. गावागावांत महिला स्वयंसहाय्य गट स्थापन करून त्यांची एक साखळीच ग्रामीण विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे. अनेक गटांचे खूप चांगले काम चालते. या उपक्रमांतून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे प्रामाणिक प्रयत्नही सुरू आहेत, यात वावगे नाही. परंतु या रचनेचा राजकीय वापरही भाजप खूप हुशारीने करत आहे. पक्षाच्या सभा, बैठकांना या महिला स्वयंसहाय्य गटांचा वापर करून गर्दी जमवणे, तसेच निवडणूक काळात या गटांमार्फत पैशांची पाकिटे पोहोचवून त्यांची मते विकत घेण्याची एक पद्धत भाजपने बऱ्यापैकी तयार केली आहे.
पक्षाच्या यशाचे हे फार मोठे गुपित इथे दडले आहे. याच कारणामुळे भाजपच्या प्रत्येक सभा, बैठकांत महिलांकडून नेत्यांवर होणारा पुष्पवर्षाव आणि एकूणच महिलांची उपस्थिती दिसून येते. या महिलांपर्यंत सोशल मीडिया पोहोचत नाही, आणि राजकीय विरोधक तर या महिलांपासून अजूनही दूर आहेत. वास्तविक हेच कारण आहे की भाजपला निवडणुका जिंकणे म्हणजे डाव्या हाताचा मळ वाटतो.
जोपर्यंत विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या तळागाळातील महिला व ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, आणि सरकारच्या अपयशाबाबत जागृती करणार नाहीत, तोपर्यंत भाजपचे कमळ या भ्रष्टाचार, कुशासन आणि बजबजपुरीच्या चिखलात कायम फुलत राहणार, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • Related Posts

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    ठिकाणी खाजगी मेडिकल कॉलेज स्थापन करण्यापेक्षा एम्ससारखी सरकारी संस्था उभी राहिली तर त्यातून आरोग्याच्या बाबतीत राज्याला मोठा आधार मिळेलच, परंतु त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय आणि स्थानिकांना अनेक रोजगारसंधीही उपलब्ध होतील. गोवा…

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    अपक्ष उमेदवारांचा कितीही भरणा असला तरी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विरोधकांचा फक्त एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभा राहिला, तर भाजपचा आत्मविश्वास कोलमडून पडेल आणि जनतेचा विश्वास ओसंडून वाहील. निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन…

    You Missed

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल