अखिल गोवा पंचायत सचिव संघटना आक्रमक
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
पंचायत सचिवांबाबत पूर्णपणे चुकीचा समज पसरला आहे. पंचायत सचिव कसे आणि काय काम करतात, हे त्यांनाच माहीत आहे. सेवाकाळात पंचायत सचिवांवर असा हल्ला होणे आणि त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साधा निषेधही व्यक्त न होणे, ही खेदाची गोष्ट आहे. यापुढे पंचायत सचिवांबाबत अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा अखिल गोवा पंचायत सचिव संघटनेने दिला आहे.
अखिल गोवा पंचायत सचिव संघटनेच्यावतीने पेडणे गट विकास कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. मोरजीचे पंचायत सचिव श्री. सचिन धाऊस्कर यांच्यावर दिल्लीस्थित संजय रेलन आणि मितेश रेलन यांनी केलेला हल्ला, तसेच गट विकास कार्यालयाची तोडफोड, हा गंभीर प्रकार आहे. याबाबत सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. “पंचायत सचिवांना कुणीच वाली नाही की काय?” असा सवालही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
पंचायत सचिवांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध वरिष्ठ अधिकारी पातळीवर होणे गरजेचे होते. पंचायत सचिव म्हणजे भ्रष्ट किंवा मुजोर असा जो चुकीचा समज पसरवला जात आहे, तो दूर होणे आवश्यक आहे. हे चित्र साफ होऊन पंचायत सचिवपदाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखला गेला पाहिजे, असेही संघटनेने स्पष्ट केले.
मुख्यमंत्री: हल्लेखोरांवर कठोर कारवाई करू
मोरजीचे पंचायत सचिव श्री. सचिन धाऊस्कर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोर पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सरकारच्या चुकीच्या धोरणांचे बळी
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचे बळी पंचायत सचिव बनत आहेत. पंचायतींचा कारभार हाकताना प्रचंड प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतो. एकीकडे पंचायत मंडळाची मर्जी आणि दुसरीकडे नागरिकांची कामे करत असताना सचिवांची सर्कस होते, असे मत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी व्यक्त केले.
राजकीय स्तरावर साटेलोटे असलेले लोक अनेक ठिकाणी जमिनी विकत घेतात आणि पंचायत स्तरावर विविध परवान्यांसाठी राजकीय नेत्यांमार्फत पंचायत सचिवांवर दबाव टाकतात. अनेक प्रकरणांमध्ये पंचायत मंडळ आणि राजकीय पातळीवर होणाऱ्या शिफारशींमध्ये तफावत असते. त्यावेळी पंचायत सचिवांना पंचायत मंडळ किंवा राजकीय नेत्यांची नाराजी पत्करावी लागते.
अनेक पंचायत सचिव प्रचंड मानसिक तणावाखाली काम करतात. “राजकीय मर्जी राखली तरच आपण योग्य पद्धतीने सेवा बजावू शकतो” असा समज रूढ झाला आहे. राजकीय नेत्यांची मर्जी राखली नाही, तर पंचायत सचिवांची एकापेक्षा अनेक ठिकाणी बदली करून सतावणूक केली जाते, असेही शेर्लेकर म्हणाले.
पंचायत सचिवांनी सेवा बजावत असताना आपण नेमके काय करतो आहोत याचे भान ठेवावे. नागरिक आणि राज्याप्रती प्रामाणिक राहून सेवा बजावावी. राजकीय दबावाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. पंचायत सचिवांवर हात उगारण्याचा अधिकार कुणालाही नाही. ही गोष्ट निंदनीय आहेच, पण भविष्यात अशा गोष्टी टाळायच्या असतील, तर पंचायत सचिवांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखावा. राजकीय गुलाम बनून वागण्याची परंपरा सुरूच राहिली, तर यापुढेही अशा हल्ल्यांची शक्यता नाकारता येणार नाही, असेही शेर्लेकर म्हणाले.





