– प्रा. प्रजल साखरदांडे यांचे विचार
गांवकारी, दि. ३१
गावडे आणि वेळीप हे गोव्याचे मूळ निवासी असून त्यांच्यापासूनच गोव्याचा इतिहास सुरू होतो. मात्र, आजच्या विद्यार्थ्यांना हा खरा इतिहास शिकवला जात नाही. भगवान परशूरामाने गोमंत भूमीची निर्मिती केली, असा इतिहास थोपवण्याचा प्रयत्न करून आपण एक मोठी चूक करत आहोत, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, लेखक आणि प्राध्यापक प्रजल साखरदांडे यांनी गोमंतक गौड मराठा समाजाच्या ६३व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
नागपंचमी निमित्त हा वर्धापन दिन कोडली तिस्क-सांवड्डे येथे साजरा करण्यात आला. गोव्यात पहिली राजवट राजा भोज यांची आली होती; मात्र गावडा व वेळीप समाजाचा इतिहास हा भोज राजवटीपूर्वीचा आहे. या समाजात निर्णयप्रक्रियेच्या वेळी गावातील लोक सहभागी होत आणि गावचा बुदवंत अंतिम निर्णय घेत असे. समाजाची ही प्रक्रिया अत्यंत लोकशाही स्वरूपाची होती. गावातील जमीनही सामूहिक स्वरूपाची होती. दुर्दैवाने, काही कारणांमुळे हा इतिहास आज विस्मरणात जात असल्याचे साखरदांडे यांनी नमूद केले.
“गावडा व वेळीप ही जात नसून एक समाज आहे. या समाजातील आजच्या पिढीने ‘गावडा व वेळीप’ म्हणून अभिमान बाळगावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
समाजाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले की, गोमंतक गौड मराठा समाज ही मूळ संस्था असून ती कै. कृष्णा रघू बांदोडकर यांनी दूरदृष्टी ठेऊन स्थापन केली होती.
“आज समाजात वेगवेगळ्या स्तरांवर फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे; पण १९६२ साली स्थापन झालेली नोंदणी क्रमांक १०८ ही संस्था कोणाच्या दावणीला बांधायला दिली जाणार नाही,” असे ठाम मत गावकर यांनी व्यक्त केले.
संस्थेचे सभासद आणि पत्रकार सोयरू वेळीप यांनी, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. त्यांनी समाजातील बांधवांना राजकीय आमिषांना बळी न पडता स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन केले.
रामा काणकोणकर यांनी समाजावर सरकारकडून होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकला.
समाजाचे अध्यक्ष मधू गावकर यांनी स्वागत केले, तर सचिव श्याम सांगोडकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलन करून आणि कै. कृष्णा रघू बांदोडकर यांना आदरांजली वाहून करण्यात आली.
या वेळी दहावी, बारावी आणि उच्च शिक्षण स्तरावर उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रगतीशील शेतकरी रोहीदास मडकईकर यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.






