“चाय पिया, सामोसा खाया” इथपर्यंत ठीक आहे, परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि जगण्याशी संबंधित विषयांचीही जेव्हा फजिती होते, तेव्हा कुणाचेही मस्तक दणाणणे स्वाभाविक आहे.
वाढत्या वयोमानानुसार वृद्धत्वाकडे वळणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. परंतु वयाचे भान न ठेवता राजकीय पदावर चिकटून राहण्याचा हव्यास बाळगणाऱ्या आणि जनतेप्रती असंवेदनशीलपणे वागणाऱ्यांचा आदर राखणे हे संस्कृतीच्या मर्यादांच्या कक्षेत येऊ शकेल काय?
सरकारमधील ज्येष्ठ नेते आणि बहुजन समाजाचे कैवारी म्हणवून घेणारे कृषीमंत्री रवी नाईक हे अलिकडे सगळ्याच गोष्टी हसण्यावारी नेत आहेत. “चाय पिया, सामोसा खाया” इथपर्यंत ठीक आहे, परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि जगण्याशी संबंधित विषयांचीही जेव्हा फजिती होते, तेव्हा कुणाचेही मस्तक दणाणणे स्वाभाविक आहे.
पेडण्यात ओंकार नामक हत्तीचे पिल्लू सध्या तेथील लोकांची शेती आडवी पाडत आहे. प्रचंड प्रमाणात कवाथे, केळी, पोफळीची नासधूस करून हा हत्ती गावांगावी भटकत आहे. अशा वेळी “हत्ती म्हणजे श्री गणेशाचे रूप, तो आपल्या भक्तांना भेटायला आला असेल, त्याचे स्वागत करा. शेतकऱ्यांना भरपाई देऊ,” असे म्हणून कृषी मंत्र्यांनी या विषयाचा विचका करणे हे निश्चितपणे सरकारला शोभणारे नाही.
हे शेतकरी बहुजन समाजाचेच आहेत. कष्ट आणि मेहनतीने त्यांनी उभे केलेले पीक एका फटक्यात हत्तीने आडवे पाडले आणि भरपाईची भाषा करून पात्रांव अशी ओळख बनलेले रवी नाईक त्यांची बोळवण करताना पाहिल्यानंतर बहुजन समाजाचीच किव वाटते.
यापूर्वी फोंडा महालात गवे, रेडे आणि बिबट्यांचा संचार वाढल्याबाबत विचारले असता “त्यांची फोंडावासीयांशी दोस्ती झाली आहे आणि त्यामुळे ते येतात,” असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. हे सगळे विषय गंभीर आहेत.
रवी नाईक यांच्याकडे कृषी खाते देऊन मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची किंमत केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एक नगण्य खाते म्हणूनच ते रवी नाईक यांच्याकडे देण्यात आले आहे. उर्वरित खात्यांसाठी जशी स्पर्धा लागते, ती स्पर्धा इथे नाही. शेतकऱ्यांप्रती फुकाची सहानुभूती दाखवायची आणि त्यांची थट्टा करायची, असा प्रकार या सरकारात सुरू आहे.
रस्त्यावर मरणाऱ्या लोकांची किंमत जशी हे सरकार भरपाईने करू पाहते, तोच प्रकार शेतकऱ्यांबाबतीत घडत आहे. एक माड किती पिढ्यांना पोसतो हे माहित असूनही त्या माडाची किंमत भरपाईने करून शेतकऱ्यांच्या कष्ट आणि मेहनतीची हेळसांड करणाऱ्या या सरकारची मतीच गुंग झाली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
एक हत्ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे काहीच उपाययोजना नाहीत. एवढे भले मोठे वन खाते काय करते? तिकडे जंगले तोडली जात आहेत, झाडांची कत्तल सुरू आहे, जनावरांची शिकार सुरू आहे, मग वन खात्याची जबाबदारी तरी काय?
वन्यजीव अभयारण्य असलेल्या गोव्यात वन्यजीव व्यवस्थापनाची काहीच सोय नसावी, यासारखे दुसरे दुर्दैव ते काय? अन्नदात्याची अशी थट्टा करू नका. शेतकऱ्यांना ही वागणूक मिळत असेल, तर मग नवे शेतकरी कसे घडतील?
बहुजन समाजाच्या नेत्यांनी किमान आपल्या समाजातील लोकांकडे सहानुभूतीने वागण्याची अपेक्षा असताना, तेच आज बहुजन समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. मग इतर समाजाच्या नावाने शंख फुंकून उपयोग काय? बहुजन समाजाच्या नेत्यांनी किमान आता तरी भानावर यावे, एवढीच अपेक्षा आम्ही करू शकतो.





